Monday, March 10, 2025

महाकुंभ २०२५ - दिवस तिसरा


जागरण मोडावं म्हणून निद्राधीन होण्याचा प्रयत्न केला खरा, पण बाजूने जाणा-या भाविकांचा जयघोष आम्हाला जागं ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करत होता. अधूनमधून डुलक्या काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर गात्रं शिथिल झाल्याच्या समाधानात अंगावरची रजई उडवून बाहेर आलो. विवेकानंद केंद्रातर्फे उभारलेला कॅम्प न्याहाळत असतानाच जीवनव्रती कल्पना दिदी आणि हार्दिकभैय्या यांची भेट झाली. आदल्या दिवशी त्यांचं तिथे येणं अपेक्षित असताना त्यांची ट्रेन अर्ध्यातच खंडीत झाली होती आणि मग दोन तीन ट्रेन्स बदलत ते आज सकाळी प्रयागराजच्या केंद्रावर पोहोचले होते. दोघांनीही विवेकानंद मिशनचं सेवाव्रत स्विकारलंय. चहा, नाश्ता आटोपल्यानंतर आम्ही त्यांचे समवेत स्नानासाठी संगमावर निघालो. गंगा, यमुना यांच्या जयघोषात चालणा-या जनसमुदायासोबत आमची पावलं पडू लागली. जनसागर म्हणजे काय ते अनुभवताना गर्दीत हरवू नये म्हणून एकमेकांवर लक्ष ठेवण्यात अतोनात तारांबळ उडत होती. अनेकांनी एकमेकांच्या हातांना उपरणी बांधली होती, तर कोणी निशाण काठी घेऊन चालत होतं. खोयापाया केंद्राला जराही उसंत नव्हती. साधारणपणे एक दीड किमी चालून यमुनेच्या धक्क्यावर आलो. सर्वत्र अफाट जनसमुदाय आणि यमुनेच्या पात्रातील बोटी यांचीच भाऊगर्दी होती. खूप वेळाने आम्हाला बोट मिळाली. आम्हाला हुश्श झालं पण खरी परीक्षा पुढे होती. किनाऱ्यावरुन नदीपात्रात बोट लोटण्यासाठी नावाड्यांची जी काही पराकाष्ठा चालली होती ती पाहून खरंच या कष्टाचं मोल होऊ शकत नाही याची जाणीव झाली. आणि हे एकदा नव्हे तर तब्बल चार वेळा... कारण संगमावर पोचलो तरी तराफ्यापर्यंत बोट पोचवणं आणि परतीच्या प्रवासात याचीच पुनरावृत्ती करणं होणार होतं. 

महत्प्रयासाने आमची बोट यमुनेच्या प्रवाहात शिरली. नावाडी माहिती देत होते. यमुनेचं पाणी गर्द हिरवट, खोल आणि संथ तर गंगेचा ओघ निळसर, उथळ आणि प्रवाही... यमुनेच्या पृष्ठभागावर विहरणारे स्थलांतरित पक्षी सीगल्स अक्षरशः हजारोंच्या संख्येने होते. बोटी जवळ आल्या की थवा उडतानाचा नजारा म्हणजे निव्वळ नेत्रसुख होतं. विशेष म्हणजे हे पक्षी गंगेच्या प्रवाहात आढळत नाहीत. जणूकाही संगमापर्यंतचं यमुनेचे पाणी हीच त्यांची हद्द....

समोरचा घाट व्हिआयपी मंडळींसाठी होता. दोन्ही घाटांवरुन भाविकांना सातत्याने सावधगिरीच्या सुचना दिल्या जात होत्या. परंतु कोठेही श्रद्धाळूंना हाकलले जाताना आढळलं नाही. संगमाजवळ पोचताच तराफ्यावर आपली नाव टेकवण्याची परिक्षा पार पडल्यानंतर हर हर गंगेच्या जयघोषात आम्ही पाण्यात उतरलो. साधारणपणे अकराचा सुमार असल्याने काकडायला झालं नाही. नावाड्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवाही गंगा तिच्या सोबत आणलेल्या चंदेरी वाळूने आमच्या पावलांना गुदगुल्या करत होती. गंगेला हळदकुंकू, वस्त्र, सौभाग्यलेणं अर्पण केलं, सोबत आणलेल्या द्रोणातून फुलवाती प्रज्वलित करुन प्रवाहात सोडल्या. कुलदैवत, ग्रामदैवत, पूर्वज, आप्तस्वकीय, पशुपक्षी आदी सर्वांचं स्मरण करुन अर्घ्य दिलं. सर्व ज्ञात अज्ञात, परिचित, सजीव यांच्यासाठी प्रार्थना केली.  प्रथेप्रमाणे अकरा वेळा गंगेत डुबक्या मारल्या. आम्ही उभे असलेल्या ठिकाणी पाणी जरा उथळच होतं म्हणून अजून पुढे जाऊन पुन्हा डुबक्या मारल्या. तरीही मन भरेना, मग जरा मोकळ्या जागी जीममधे डीप्स मारतात तशा पद्धतीने संपूर्ण शरीर पाण्याखाली नेण्याचा आनंद मिळवला. 

तासभर स्नानाचा आनंद लुटूनही मन भरलं नव्हतं. नावाडी देखील निवांत होते. दुसरी फेरी मिळावी यासाठी त्यांची जराही भुणभुण नव्हती. आम्हाला जरा नवलच वाटलं... येणा-या जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा कोलाहल कानी पडत होता. गंगेच्या प्रवाहात पाण्याखाली डोकं नेताच मात्र निव्वळ शांतता. बराच वेळ थांबूनही "के दिल अभी भरा नहीं" अशी आमची अवस्था झाली होती. खोल पाण्यात डुबक्या मारण्याच्या मोहात आमच्या बोटी पासून दूर आलो होतो. दूरवरुन सगळंच सारखं दिसू लागलं. अंदाजानेच तराफा शोधून आमच्या बोटी जवळ आम्ही उभे राहिलो. आता मात्र प्रवाहातून बाहेर येण्याची आवश्यकता होती. आमच्या बोटीतील इतर भाविक स्नान आटोपून कपडे बदलून नाव निघण्याच्या प्रतिक्षेत होते. तराफ्याच्या दिशेने टाकलेल्या पावलाला मऊशार वाळूत काहीतरी टोचलं. पाण्यात हात घालून हातात आलेली वस्तू बाहेर काढली तो गंगेला अर्पण केलेला तांब्याचा गडू होता. शिगोशीग भरलेली वाळू आणि तो गडू हा गंगेचा प्रसाद समजून सोबत घेतला. बोटीतील रिकामे बुधले घेऊन पुन्हा प्रवाहात लांबवर गेलो. जिथे कोणी नाही अशा ठिकाणी ते बुधले गंगोदकानं भरुन आणले. आमची भाग्यरेषा ठळक होती म्हणून आम्हाला या महाकुंभात गंगास्नान घडलं पण ज्यांना जमलं नाही किंवा जमणार नव्हतं, त्यांना घरच्या घरी गंगास्नान व्हावं म्हणून आवर्जून मोठे बुधले भरुन गंगाजल सोबत घेतले. पुन्हा एकदा यमुनेच्या पाण्यात बोट नेण्याची परिक्षा आमच्या नावाड्यांनी दिली आणि काही काळातच आम्ही अरैल घाटावर पोचलो.  इतका वेळ झाला होता पण कोणालाच भुकेची जाणीव नव्हती. केंद्रावर परत आल्यावर घड्याळाकडे लक्ष गेलं तेव्हा कळलं की जवळपास तीन वाजायला आले होते. अर्थातच कोठेही जेवण मिळणं शक्य नव्हतं. सोबत आणलेला खाऊ हाच आमच्या पोटाचा आधार ठरला.

विश्रांतीनंतर चहा घेऊन आम्ही बाहेर पडलो. लेटे हूए हनुमान मंदिराला अलोट गर्दीमुळे जाणं अशक्य होतं. नैनी पुलावर केलेली नेत्रदीपक रोषणाई बघून नजीकच्या शिवालय पार्क परिसराकडे जाण्याचा आमचा निर्णय योग्य ठरला. दिव्यांच्या रोषणाईने सारा परिसर झगमगला होता. पण ती त्याची खरी ओळख नव्हती.

सुमारे ११ एकर परिसरात भारतीय नकाशाच्या आकारात जवळपास १४ करोड रुपये खर्च करुन हा परिसर उभारला आहे. संपूर्ण परिसर भगवान शंकराला समर्पित असून भारतातील महत्वाच्या शिव मंदीरांची प्रतिकृती इथे उभारली आहेत. भारतीय संस्कृती, वास्तुकलेची भव्यता, मंदीरांचं महात्म्य आणि पौराणिक दिव्यता यांचा संगम आपल्याला इथे अनुभवता येतो. १२ ज्योतिर्लिंग आणि देशातील महत्वाच्या शिवस्थानांचं आपण एकाच ठिकाणी इथे दर्शन करु शकतो. यात प्रसिद्ध सोमनाथ मंदिर, महाकालेश्वर, रामनाथ स्वामी मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर, वैद्यनाथ मंदिर, भीमाशंकर मंदीर, लेपाक्षी मंदिर, पशुपतीनाथ मंदिर यांचा या निमित्ताने विशेष उल्लेख करावा लागेल.  या प्रतिकृती उभारताना लोखंडी वेस्ट मटेरियलचा वापर ही उल्लेखनीय बाब असून रात्रीच्या वेळी विजेच्या रोषणाईने सारा परिसर आपल्याला भारुन टाकतो. कोणत्याही कोपऱ्यात तुम्हाला ओम् नमः शिवाय चा जप सतत ऐकू येतो. प्रयाग राजला एक पुरातन अशी धार्मिक मान्यता आहेच पण या महाकुंभाच्या निमित्ताने ज्या गोष्टी नव्याने उभारल्या गेल्या आहेत, त्यामुळे प्रयागराजची नवीन ओळख देखील निर्माण झाली आहे. अशा ठिकाणांहून पाय न निघण्याचा अनुभव एकाच दिवसात आम्ही दोनदा घेत होतो. अखेरीस पार्कची वेळ संपल्यामुळे नाईलाजाने आम्ही बाहेर पडलो. आज मात्र थंडी पडली होती. कष्टानं पाय ओढत कसेबसे केंद्रावर आलो. दुपारचं भोजन न झाल्याने आणि संध्याकाळच्या पायपीटीने पोटात कावळे कोकलत होते. आल्याआल्या गरमागरम रुचकर जेवण मिळालं. इथून पुढे वाराणसीला काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं नियोजित होतं पण तिथे असलेल्या मित्राच्या फोन मुळे कळलं की त्या क्षणाला तिथे किमान आठ ते दहा लाख भाविक आहेत आणि पार्किंगला जागाच नाहीये. ते स्वतः आठ किमी लांब गाडी लावून चालत पोचले होते. रात्रीच्या वेळी प्रयाग राज सोडण्याचा निर्णय मित्राच्या फोनने आणि डोळ्यांवर पसरलेल्या झोपेनं पुढे ढकलला. आमच्याकडे अयोध्येच्या रामलल्ला दर्शनाचे व्हिव्हिआयपी पास होते. अठरा तारखेच्या रुम्स बुक होत्या. मित्र वाराणसी हून अयोध्येला जाणार होता. आता आमच्याकडे स्पेअर दिवस होता म्हणून आमच्या अयोध्या रुम्स त्यांना देऊन उद्या उशिराने प्रयागराज सोडण्याचं ठरवून आम्ही दुलईत गुडूप झालो.


मनोज भाटवडेकर 

१७.०२.२०२५

Monday, March 3, 2025

महाकुंभ २०२५ - दिवस दुसरा


सकाळी पटापट आवरुन आम्ही प्रयागच्या दिशेने निघालो. जगप्रसिद्ध पेंच अभयारण्याची विविध प्रवेशद्वारं मागे टाकत महाराष्ट्राची हद्द ओलांडून खवासा येथे मध्यप्रदेशात प्रवेश केला. अनेक छोटी छोटी हॉटेल्स बघून पर्यटकांनी रात्रीपुरता आसरा घेतला होता. या रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांची गर्दी वाढू लागली होती. सिवनी, लखनादौन मागे टाकत आम्ही जबलपूरला पोचलो. होंडाची शोरुम शोधून लाईटचा दोष दूर केला आणि दुपारच्या जेवणाला कटनी रस्त्यावर धाबा पाहून थांबलो. या भागात शेवभाजी खूप फेमस आहे. कटनीनंतर मैहरजवळ डावीकडे रस्ता चित्रकूटला जातो. रामायण कालीन संदर्भाने चित्रकूट खूप प्रसिद्ध आहे. प्रयागराजवरुन परत येणारे श्रद्धाळू चित्रकूट करुनच परत जात होते. संध्याकाळी रिवाच्या आसपास प्रचंड वाहतूक कोंडीत आम्ही सापडलो. अर्थातच हे अपेक्षित होतं. बायपासला वळविलेली वाहतूक देखील कोंडीत अडकली होती. मधलाच रस्ता पकडून आम्ही रिवा शहरात शिरलो. इथे मात्र तुलनेने कमी गर्दी होती. मधेच कधीतरी मध्यप्रदेशची हद्द ओलांडून आम्ही उत्तर प्रदेशात प्रवेश केला. सर्वत्र पर्यटक आणि त्यांची वाहने यांची भाऊगर्दी होती. ठिकठिकाणी वाहतूक वळविल्यामुळे आपण कोठून कोठे जातोय याचा काहीही ताळमेळ लागत नव्हता. एका ठिकाणी हायवे इतका जाम होता की शेजारच्या वस्तीत शिरुन कच्च्या रस्त्याने गेलो तर वेळ वाचेल असं मॅप दाखवत होता म्हणून अनेक पर्यटक तिकडे जात होते. रात्रीच्या वेळी शब्दशः गल्लीबोळ, शेताडीमधले रस्ते पालथे घालत जाताना गावकरी, मुलं हातात खडूने लिहीलेले बोर्ड दाखवून आम्हाला योग्य रस्त्यावर नेण्याची सेवा करत होते. जसजसं प्रयाग राज जवळ येत गेलं तसतशी वाहतूक कोंडी इतकी होत गेली की गाडीला चिकटून दुसरी गाडी उभी राहत होती. दरवाजे उघडणं पण शक्य नव्हतं. बराच वेळ वाहतूक हलेना म्हणून कसंबसं दार उघडून मनोजवं चालत खूप पुढे गेला. लागोपाठ चार ट्रेन्स जाणार होत्या म्हणून रेल्वे फाटक बंद होतं. बेशिस्त वाहनचालक एका रांगेत न थांबता पुढे घुसत असल्याने फाटक उघडलं तरी रांग पुढे सरकत नसे. कंटाळलेले वाहनचालक आजूबाजूच्या शेतात गाडी पार्क करुन चालत पुढे जात होते.

आमचं वास्तव्य नैनी पुलाशेजारी अरैल घाटाच्या सेक्टर २३ मधे स्वामी विवेकानंद केंद्रात ठरलेलं होतं. मनोजवं विवेकानंद केंद्राशी निगडीत असल्यामुळे आमची सोय तिथे नियोजित होती. आम्ही उभे होतो तिथून केंद्र १४ किमी दूर होतं. हे अंतर चालत जाण्यासारखं निश्चितच नव्हतं त्यामुळे आलिया भोगासी करत आम्ही पुढे सरकत होतो. रिवा गावाजवळ असतानाच प्रयाग राज येथून बाहेर पडणाऱ्या एका कार्यकर्त्याने मनोजवं ला फोन करुन गाडी केंद्राजवळच्या पार्किंग पर्यंत जाईल असं कळवलं होतं पण एकंदरीतच वाहतूक हलल्याशिवाय तिथपर्यंत पोचणं दुरापास्त वाटू लागलं... अखेरीस इंच इंच लढवत आमची गाडी मुख्य रस्त्यावर आली. परतीच्या वाहतुकीने कोंडी मधे भर घातलेली होतीच. खूप वेळानंतर पोलिस चेक पोस्टजवळ गेल्यानंतर सर्व वाहतूक भलत्याच दिशेला फिरवलेली असल्याचा साक्षात्कार झाला. पोलिस सांगतील तसं सरस्वती हाय टेक सिटीमधल्या सगळ्या रस्त्यांवरुन गाडी फिरवत पुन्हा आम्ही त्याच ठिकाणी येऊन उभे राहिलो. अखेरीस एका ठिकाणी तीळा तीळा दार उघड असं करत अरैल घाटापासून जवळच असलेल्या ओमेक्स हाय टेक सिटीच्या पार्किंग प्लेसला पोचलो. इथून पुढे सक्तिची पायपीट होती आणि शिल्लक अंतर ६ किमी होतं. आतापावेतो १४ किमी साठी आठ तास कोंडीचा सामना केल्यानंतर ओमेक्स सिटीच्या मैदानात उभारलेल्या पार्किंगला गाडी लावली. मॅपवर पार्किंगची खूण केली, अत्यावश्यक वस्तूंची एक बॅग पाठीवर अडकवली आणि पायपीट सुरु केली. पहाट होत आली होती आणि जिकडे तिकडे श्रद्धाळूंचे जत्थे चालताना दिसू लागले. त्या भाऊगर्दीत इलेक्ट्रीक रिक्षा आणि दुचाकी यांनाच फक्त परवानगी होती. मागच्या सीटवर दोन दोन लोकं बसवून अपेक्षित ठिकाणी सोडण्याची कसरत चालली होती. आम्ही एका बाईक वाल्याला थांबवलं, दोनशे रुपये मोबदला मान्य करुन एक जोडी निघाली. स्थानिकांना हा उत्पन्नाचा मार्ग मिळाला होता. दिवसरात्र काम केलं तरी गि-हाईक संपणार नाही इतकी गर्दी... स्वयंरोजगारीत, कॉलेजला जाणारे युवक आपापल्या दुचाक्या घेऊन छान कमाई करत होते. येणारी लक्ष्मी मिळविण्यासाठी घेत असलेल्या मेहनतीला तोड नव्हती. त्या अफाट गर्दीतून तोल सावरत इच्छित स्थळी नेणं म्हणजे खाऊच्या गप्पा नव्हत्या. अख्खी रात्र वाहतूक कोंडीत काढून आम्ही अखेरीस विवेकानंद केंद्राजवळ पोहोचलो. उशिरा का होईना पण नियोजित वेळापत्रकानुसार आम्ही प्रयाग राज येथे मुक्कामी पोहोचलो होतो. सकाळ झालेली असल्यामुळे संगमावर जाणाऱ्या लोकांची गर्दी सुरु झाली होती. यमुनेच्या प्रत्येक तटावर वाळूमध्ये गाड्या फसू नयेत यासाठी पोलादी प्लेट्स टाकून रस्ते केलेले होते. नदी ओलांडण्यासाठी अस्थायी स्वरूपात पादचारी पूल उभारलेले होते. याआधी घडून गेलेल्या एका प्रसंगातून धडा घेत श्रद्धाळूंना सुखरुप पुढे जाण्यासाठी सातत्याने वाहतूक नियमन केलं जात होतं. हजारो एकरात उभे आडवे रस्ते आखून कोंडी होणार नाही यासाठी प्रत्येक यंत्रणा अखंडपणे राबत होती. ठिकठिकाणी होड्यांचे धक्के उभारलेले होते तरीही पर्यटकांची संख्याच इतकी होती की या व्यवस्था पण अपु-या पडाव्यात. 

सकाळच्या वेळेत असणारी गर्दी पाहता जागरण मोडण्यासाठी अडीच तीन तासांची निश्चिंती करुन आम्ही तंबूचा आश्रय घेतला. 


क्रमशः 

१६.०२.२०२५

Saturday, March 1, 2025

महाकुंभ २०२५ - दिवस पहिला

सर्वत्र महाकुंभाची आणि त्यातील रोजच्या गर्दीच्या उच्चांकांची चर्चा ऐकायला येत होती. १४४ वर्षांनंतर जुळून आलेल्या या योगाची पेपर, फेसबुक, व्हॉट्स अप वर रोजची चर्चा वाचायला मिळत होती. आपणही या गर्दीचा एक हिस्सा असू असं मला जर कोणी जानेवारीच्या मध्यात सांगितलं असतं तर मी फक्त हसलो असतो. अमरनाथ यात्रेनंतर अती गर्दीच्या ठिकाणी जाणं मी सहसा टाळत आलोय. पण अमृताच्या "जाऊया का आपण सुद्धा" या एका अचानक प्रश्नावर माझ्या तोंडून होकार कधी गेला कळलंच नाही. महाकुंभ म्हणजे नुसतं हो म्हटलं आणि निघालो इतका सोपा भाग कधीच नव्हता. रेल्वे तिकीट्स शिल्लक नाहीत, विमानाचा खर्च खिशाच्या ताकदीपलिकडचा, त्यामुळे स्वतःची गाडी नेणं एवढाच पर्याय हाती होता. एवढ्या लांब जायचं तर इतरही ठिकाणं करायची म्हणजे किमान आठ ते दहा दिवसांची बेगमी करायला हवी हे निश्चित होतं.
८ फेब्रुवारीला माझा १२०० किमी सायकलिंग इव्हेंट होता. त्यामुळे त्यानंतरच जाणं शक्य होतं. घरी आईबाबा वयस्कर असल्याने त्यांची सगळी सोय बघणं हा घराच्या भिंती आतला भाग स्वाभाविकच अमृताने निभावला. भिंती बाहेरचा म्हणजे रुट, ठिकाणं, सोबती हा विषय माझ्याकडे होता. १२ फेब्रुवारीला अमृत स्नान पर्वणी होती त्यामुळे ती गर्दी ओसरल्यानंतर म्हणजे १५ तारखेला निघायचं निश्चित करुन ठेवलं. आईबाबांच्या सोबतीला एक बहिण येणार होती, भरीला अनुप होताच. एक बाजू निभावली म्हटल्यावर सोबत कोण घ्यायचं याचा विचार सुरु झाला. सोबत यायला अनेकजण इच्छुक होते पण शक्यतो गाडी चालवणारे आणि इतके दिवस सुटी काढणारे हवे होते. एका ग्रुप वर कोणीतरी "कुंभाला जाऊन आलेले किंवा जाणारे कोण आहेत" अशी पृच्छा केली त्यावर मी जाणारा म्हणून हात वर केला. दुसऱ्याच मिनिटाला मनोजवं चा मेसेज आला, की सोबती ठरले नसले तर मी येऊ का? प्रवासाची आवड असणारा आणि भरपूर अनुभव, ओळखी गाठीशी असणारा मनोजवं सेकंदात होकार घेऊन फायनल झाला. नुकतीच अमेरिका वारी झालेली असल्याने मनोजवं एकटाच येणार होता. म्हणून अमृताने तिच्या बहिणीला सौ. सायलीला भीतभीतच विचारलं, तर ती चक्क तयार झाली. तिचं हो म्हणणं हा मला जरा धक्काच होता पण त्यामुळे सोबती कोण हा विषय निकाली निघाला. प्लानिंगला सुरुवात झाली खरी पण १२०० किमी सायकल इव्हेंटमुळे किमान पंधरा दिवसानंतरची आमची तारीख असल्याने कधी कोणाची नकारघंटा वाजेल याची पोटात थोडी धाकधूक होती. इतर इच्छुकांना प्लान बी म्हणून होल्डवर ठेवून मी १२०० किमी सायकलिंग इव्हेंटच्या तयारीत गुरफटलो.  ८ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी असा सायकल इव्हेंट आटपून मी आलो तोच खोकला आणि सर्दी घेऊन. लेकीने आधीच औषधं सुरु केली होती पण थकवा होता. आराम करुनही उतार पडत नव्हता. पण आता ठरलंय तर मागे यायचं नाही म्हणून तयारीला लागलो. मनोजवं सोबत रुट, ठिकाणं, बुकींग यांची रुपरेषा फायनल झालेली होतीच. १४ तारखेला चिपळूणला येऊन एकत्रित निघण्याचं ठरलं होतं त्यानुसार १५ तारखेला सकाळी ५.३० ला आम्ही चिपळूण हून प्रस्थान ठेवलं.
कोयनानगर ते पाटण खराब रस्त्याला पर्याय म्हणून कोयना नदीच्या दुसऱ्या काठाने प्रवास करुन सातारा, लोणंद, अहिल्यानगर मागे टाकत शनि शिंगणापूरच्या आसपास पोटपूजा केली. कोरड्या हवामानामुळे हवेत उष्णता जाणवत होती.छत्रपती संभाजी नगरला समृद्धी महामार्गाला जॉईन होण्याचा चक्रव्यूह भेदून आमचा प्रवास सुरु झाला. आता नागपूर ४५४ किमी दूर होतं पण गुगल मॅप हेच अंतर आम्हाला साडेचार तासात पार होण्याची ग्वाही देत होता. समृद्धी महामार्गावर हे शक्य असल्याने रात्रीच्या नागपूर मुक्कामाबाबत आम्ही निश्चिंत होतो. सांजवेळ झाली आणि गाडीचे दिवे उजळले. थोड्याच वेळात असं लक्षात आलं की आपल्या गाडीचा हाय बीम लाईट चालत नाहीये. सुदैवाने एक फ्युएल पंप जवळच होता. तिथे गाडी लावून खुडबुड करुन बघितली. दोन्ही बल्ब्ज ओके होते, बहुतेक वायरिंग सर्किट मधे गडबड होती. नाईलाजाने आम्ही लो बीमवर पुन्हा पुढे निघालो. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातून प्रयाग राजला जाणारे बहुतांश जण नागपूर मुक्कामासाठी उमिया धामला पसंती देतात. सुरुवातीच्या फोनवर आम्हाला नकार मिळाला पण सोबत फॅमिली आहे हे सांगितल्यानंतर आम्हाला रुम मिळाली. यथावकाश साडेनवाला जवळपास ९००+ किमी अंतर कापून आम्ही नागपूरला पोचलो. रस्त्यापलिकडे काकांचा ढाबा नामक हॉटेलमधे आमची पोटपूजा झाली. दुसऱ्या दिवशी प्रयाग राजला लवकरात लवकर पोचण्याचं उद्दिष्ट होतं कारण महाकुंभाला भारतभरातून येणाऱ्या श्रद्धाळूंच्या गाड्या प्रयाग राजच्या दिशेने धावत असल्याने चक्का जामच्या बातम्या आमचं टेन्शन वाढवत होत्या...

क्रमशः 
१५.०२.२०२५