Saturday, October 31, 2020

Thousand by hundred

Thousand by hundred
३०.१०.२०२०

आजचं टार्गेट होतं शंभर किमी सायकलिंग.... सोबत एलिव्हेशन पण एक हजार मीटर पेक्षा अधिक करायचं होतं.... थोडक्यात सपाट रस्त्यावर सायकल चालवून उपयोग नव्हता. एकच ऑप्शन म्हणजे कुंभार्ली घाटमाथा. पण तिथेपर्यंत गेल्यावर ना सेंच्युरी पूर्ण होत ना एलिव्हेशन पूर्ण होत.. घाटमाथा उतरुन पुढे गेलं, अगदी कोयना बसस्टँड पर्यंतचं गेलं तरी अंतर ४४ किमी होतं. कदाचित एलिव्हेशन मिळेल पण अंतराचं काय म्हणून शिवसागर जलाशयाच्या काठाने ओझर्डे धबधबा हे डेस्टिनेशन मनात धरलं. अंतर ५३-५४ किमी होतं आणि चढही आहेत. परतीच्या प्रवासात कुंभार्लीचा कोयना बाजूचा चढ.. दोन्ही टार्गेट्स साध्य होतील याची खात्री पटल्याने सकाळी पावणेपाचला घर सोडलं.
पोफळी चेकपोस्टला पोचता पोचता पूर्व दिशा उजळू लागली. जसा घाट चढू लागलो तसा हवेतील गारवा पण वाढू लागला. अशा आल्हाददायक वातावरणात सायकल चालवणं म्हणजे निव्वळ सुख.. पोफळीतून लोकं मॉर्निंग वॉकसाठी घाटरस्त्याला चालत असतात. हायहँलो करत पुढे जात घाटातून तांबे कँटीन कडे जाणाऱ्या फाट्यावर थांबलो. एक गावठी पण गोडूला कुत्रा शेपटा हलवत पुढे आला. कुत्रा हा माझा वीक पॉईंट, त्याच्या चारपाच उड्या अंगावर घेऊन पुढे निघालो.
बघता बघता सोनपात्राचं वळण आलं. चार फोटो झाले. शेळके आजोबांशी गप्पा झाल्या आणि सायकल पुढे निघाली. काही दिवसांपूर्वी म्हणजे नेमकं सांगायचं तर १६ ऑक्टोबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पन्नाशीतील पन्नाशी पूर्ण करण्यासाठी इथवर आलो होतो. आज मात्र बराच पल्ला मारायचा असल्याने लगेचच पुढे निघालो.
याआधीची घाटमाथा राईड अगदी धुवाँधार पावसात होऊनही शेवटच्या किलोमीटर मधे जामच कुथायला झालं होतं. पण आज मात्र सोनपात्रा ते घाटमाथा टप्पा हसतखेळत म्हणावा असा पार झाला. बाईकवाले अंगठा दाखवून दखल घेत होते. अचानक एक कार थांबली आणि आतून एक जवळचा मित्र आणि त्याची बायको उतरली. दोनचार मिनिटांच्या संवादानंतर जो तो आपल्या मार्गाला लागला. घाटमाथ्यावर पोचून फोटोसेशन आणि पोटपूजा एकाच थांब्यात उरकून घेतलं आणि उताराला लागलो. 
उतार संपला आणि समोर आलेल्या रस्त्याचं वर्णन काय सांगू देवा... निव्वळ गलिच्छ, घाणेरडा रस्ता. इथून हेळवाकला आठ किलोमीटर जाईपर्यंत यमयातना सहन करत एसटीच्या रस्त्याला डावीकडे वळलो. हा रस्ता मात्र मख्खन होता पण चढ काही ठिकाणी परिक्षा बघतात. 
एकदाचा कोयना बसस्टँड आला. इथूनच समोर जाणारा रस्ता ओझर्डे धबधब्याकडे जातो. नेहरु गार्डन जवळच्या चढाने मात्र सत्वपरिक्षा पाहिली. अगदी १x१ गियरवर पण पायात पेटके आले. संपला बाबा एकदाचा चढ आणि समोर आला पाबळनाला धबधबा. अजूनही भरपूर पाणी आहे धबधब्याला. समोरच अथांग असा शिवसागर जलाशय पसरला होता. 
कामरगाव, मिरगाव मागे टाकत वृक्षराजीच्या एका नैसर्गिक बोगद्यात शिरलो. ओझर्डे जवळ आल्याची खूण. नुकताच पाऊस संपल्याने पाण्याची पातळी अत्त्युच्च आहे. अगदी धबधब्याजवळच्या पुलापलिकडे पण फुगवटा आलाय.
कोरोनामुळे प्रवेशबंदी आहे म्हणून बाहेरुनच फोटोग्राफी करुन मी परतीचा प्रवास सुरु केला. जितका आलो तितकंच परत जायचं होतं आणि उन रणरणायला लागलं होतं. पण झाडांच्या सावलीतून जाताना थंडगार झुळका श्रम विसरायला लावतात. वाटेत एक रस्ता अगदी पाण्यापर्यंत जातो. काठावर सायकल लावून निळसर जलाशयाचे फोटो काढले. मुख्य रस्त्यावर येईपर्यंत एवढ्याश्या त्या रस्त्याने चांगलाच घाम फोडला. 
परतीच्या रस्त्यावर हेळवाक येईपर्यंत आता उतारच उतार आहेत. त्यामुळे कोयना स्टँडजवळ येताच तिथला छोटासा सुद्धा चढ नको म्हणून पाटण रस्त्याला लागून जुन्या पुलापर्यंत येऊन हेळवाक गाठलं. नेहमीच्या हॉटेलमध्ये पोटपूजा आटपली. 
माझ्या बहिणी आजच पुण्याहून येणार होत्या. त्यांना हेळवाकला थांबवून सरप्राईज दिलं. निघे निघेपर्यंत आणखी एक मित्र येत असल्याचा फोन आला. पण तो पाटणजवळ असल्याने त्याला घाटमाथ्यावर भेटू असा विचार करुन सायकल दामटली. 
खड्डे चुकवण्याची पराकाष्ठा करताना नवनवीन खड्ड्यातून जात घाटाच्या पायथ्याशी आलो. आता मात्र सावली औषधाला पण नव्हती. चढावर असताना मी सहसा एंड पॉईंटकडे न बघता मान खाली घालून कशात तरी मन गुंतवतो. सकाळचाच फंडा वापरत अथर्वशीर्ष पठण सुरु केलं. आम तो आम, गुठलीओंके भी दाम... डबल फायदा. घाटमाथ्यावर थांबलो तरी पण मित्राचा पत्ता नाही म्हणून मनातच सोनपात्रा मिटींग पॉईन्ट ठरवला. सायकल उताराला लागली. वाटेत एक शँमेलिऑन भर उन्हात रस्ता पार करत होता. नक्की कोणत्या तरी गाडीखाली गेला असता. उचलून दरीच्या बाजूला सोडण्यापूर्वी फोटो मस्टच होते. तो त्याच्या मार्गाने गेला मी माझ्या... 
सोनपात्राला शेळके आजोबा होतेच. घुमटीशेजारी अंग लोटलं आणि कंबर लांब केली. दहाएक मिनिटात मित्र आला, ख्यालीखुशाली झाली आणि पुन्हा घाट उतरायला सुरुवात झाली. पोफळी येईतो हवेतील उष्मा जाणवण्याइतपत वाढला. अजून वीस किलोमीटर, तेही असह्य उकाड्यातून... पण आता सायकलने वेग पकडला होता. मुंढे फार्मजवळ टपरीवर पाणी भरुन घेतलं आणि पिंपळी कँनॉलजवळ थंडगार ताकासाठी थांबलो. खरंच छान ताक मिळालं. एकास एक असे दोन ग्लास रिचवले आणि निघालो. बहादूरशेख आला आणि मग मात्र गती मंदावली. शेवटचे दोनचार किलोमीटर उरले की अगदीच कंटाळा येतो. दर शंभर मीटरवर आता किती उरलं याचा जप करत घरापाशी पोचलो. स्ट्राव्हावर व्यवस्थित नोंदी करुन घेतल्या. लेकाच्या मदतीने स्ट्रेचिंग केलं. अंघोळ झाली आणि पंखा फुल्ल सोडून मी निद्राधीन झालो. डोळ्यांवर झोप आरुढ होण्यापूर्वी पुन्हा एकदा पाहून घेतलं.. 108 किमी आणि 1304 मीटर एलिव्हेशन.... याचसाठी केला होता अट्टाहास... आजच्या दिवसाचं सार्थक झालं..

मनोज भाटवडेकर
९४२१२५३१५३

Monday, September 21, 2020

हिराबा....


"अहो वैनी, असं काय करता? ओली बाळंतीण तुम्ही नी रडतांय काय?"
"अग हिरा, तीन महिने झाले, शाळेवर हजर व्हायला लागेल. आडगावी शाळा... लेकाला सोबत तरी कशी नेणार आणि इथे ठेवायचं तर कुणाकडे ठेवणार?"
"मनोजची काळजी करु नका, मी सांभाळेन. सकाळी भांडी घासून झाली की माझ्यासोबत घरी नेत जाईन. माझ्या चार मुलग्यांसारखाच हा पाचवा मुलगा. तुम्ही नका काळजी करु"

त्या दिवसापासून हिराताई माझी दुसरी आईच झाली. बापू मुंबईला पोलिसात,  पदरात चार मुलगे. पगार बेताचा, महागाईचा काळ त्यामुळे धुणीभांडी करुन संसाराला हातभार लावणा-या अनेक कर्तबगार स्त्रियांप्रमाणेच हिराताई पण आमच्या घरी यायची. खरंतर आमच्या घराशी तिचा त्याहूनही जुना स्नेहसंबंध. हिराताईची आई म्हणजे शांताबाई आणि माझी आज्जी ताईआजी यांच्यापासून सुरु झालेला. दोघी जीवाभावाच्या मैत्रिणीच. त्याकाळी आर्थिक, सामाजिक कोणतीच भिंत त्यांच्या आड नव्हती. शांताबाईच्या सोबत हाताशी म्हणून हिराताई यायची. लग्न झाल्यानंतर काही काळ गेली असेल मुंबईत, पण जागा आणि खर्च यांचा ताळमेळ त्याहीकाळी जमत नसे. शेवटी पुन्हा बि-हाड चिपळूणला हललं आणि मग शिमगा, गणपतीला बापू चिपळूणला यायचे.

शांताबाई अत्यंत सोशिक, गरीब स्वभावाची. बोलणं पण इतकं हळूवार की मनातला सल तिच्याजवळ बोलताना समोरचीला आधारच वाटावा. कोणाला दुखवणं नाही की इकडचं तिकडे सांगणं नाही. तो काळच मुळी माणसं जोडून राहण्याचा असल्याने प्रेमळ स्वभावाच्या शांताबाईचे हे सगळे संस्कार हिराताईवर होत होते. या पार्श्वभूमीवर माझ्या आईची अडचण सोडवायला हिराताई पुढे आली नसती तरच नवल होतं. शांताबाईची सगळी कामं पुढे हिराताईने आपल्या अंगावर घेतली आणि मग आमच्या घरी तिचा राबता सुरु झाला. जसं आजीसोबत तिचं सूत जमलं तशी माझ्या आईजवळ पण तिची गट्टी जमली. हिराताई जरा स्पष्टपणे बोलणारी असल्याने कधीकधी माझ्या बाबांना पण तोंडावर सुनावून मोकळी व्हायची.
 
एकदा एखादी जबाबदारी घेतली की मग मागेपुढे नसल्याने सकाळी आमच्या घरची कामं झाली की मला घेऊन हिराताई तिच्या घरी घेऊन जायची. दुपारचं जेवण वगैरे सगळं तिकडेच. मी हळूहळू मोठा होत होतो. तरीही नकळतं वय होतं. कधीतरी वाराच्या दिवशी माझी जेवणाची वेळ आणि बाकीच्यांची वेळ वेगळी असते हे कळायला लागलं. त्यांच्या ताटातलं वेगळेपण मला कळतं हे समजताच हिराताई मुलांना जेवायला वाढून मला घेऊन बाहेर जायची. "ब्राह्मणाचं पोर आहे, विश्वासानं सोपवलंय माझ्याकडे तर भ्रष्टकार होता कामा नये" या जाणीवेतून ती लक्ष ठेऊन असायची. शाळेचं दप्तर, डबा घेऊन मी हिराताईचं बोट धरुन तिच्या घरी यायचो. रस्त्याच्या पलिकडेच शाळा असल्याने शाळेची वेळ होईपर्यंत मी तिथेच असायचो. जेवण भरवणं, भांग पाडून शाळेची सगळी तयारी इतक्या मायेनं करायची की आई मला सोडून शाळेत जाते याचं कधीच काही वाटलं नाही. कधीतरी असाही प्रसंग घडला असण्याची शक्यता आहे की संध्याकाळी आई आल्यावर घरी जायला मी नकार पण दिला असेल.
 
हिराताईच्या आसपास घरं खूप, मुलांची संख्या पण बक्कळ, त्यामुळे खेळायला सवंगड्याचा तुटवडा नाही. कोकणातले मुख्य सण दोन,  गणपती आणि शिमगा. गणपतीची मोठी मूर्ती असते हे मी हिराताईकडेच पाहिलेलं अन्यथा आमच्याकडे सर्वात कमी किमतीची मूर्ती हाच निकष असायचा आणि चारपाच आरत्या झाल्या की घालीन लोटांगण व्हायचं. पण गोगडेवाडीत ढोलकी, टाळ वाजवून होणाऱ्या दहापंधरा आरत्यांची कायमच ओढ असायची. गणपतीच्या दिवसात खेळे, जाकडी इथेच पाहिली. जी गत गणपती उत्सवाची, तीच शिमग्याची. भैरीबुवाची पालखी आली की मग हिराताईकडून फुगा ठरलेला. फुग्याला शेपटी जोडून तिचा मुकुट करुन माझ्या डोक्यावर चढवायची. अजूनही शिमगा म्हटलं की मला तो फुगा आठवतो. 

कधीतरी बापू मुंबईहून यायचे. आपल्या मुलांबरोबर मलाही कपडे. खाऊ आणायचे पण त्याकाळी पोलिसांची इतकी भिती असायची की मी बापूंजवळ फारसा जायचो नाही. हिराताईची मांडी हेच आमचं सिंहासन होतं. चौथीला मला स्काँलरशिप मिळाली याचा हिराताईला काय आनंद.. सुभाषला म्हणायची बघ, त्याची आईसुद्धा जवळ नसते अभ्यास घ्यायला पण मार्क बघ... तुम्हा मेल्याना आयशीच्या जवळ असून चांगले मार्क मिळवता येत नाहीत.  समोरची शाळा चौथीपर्यंतच होती. पाचवीला मी हायस्कूलला गेलो, या घरचा संपर्क थोडा कमी झाला. पुढे बापूना मुंबईत खोली मिळाली. हिराताई मुंबईला गेली आणि मग पुढे तीही बापू़ंसारखीच सणावारी चिपळूणला यायची. अनिलदादा, सुनीलदादा, दिलिप, आणि सुभाष आपापली शिक्षणं संपवून नोकरी, धंद्याला लागले. जिथून बापू निवृत्त झाले, त्याच पोलिस खात्यात सुनिलदादा नोकरीला लागला याचा हिराताईला प्रचंड आनंद झाला. मी आयुष्यात पहिल्यांदाच मुंबईत गेलो तेव्हा मुद्दाम तिच्या खोलीवर गेलो होतो. 
चारी मुलांचे संसार सुरु झाले, जागा अपुरी म्हणून हिराताई बापू चिपळूणला आले. रोज नाही तरी दोनचार आठवड्यातून एकदा तिची चक्कर व्हायची आमच्याकडे. दिलिप वीजमंडळात चिपळूणलाच आला, सुभाषने रिक्षाव्यवसाय स्विकारला. वृद्धत्वाने बापूंना आपल्यासोबत नेले पण हिराताई लोखंडी कांबीसारखी खणखणीत होती. चार सुना, नातवंडं, पतवंडं यांच्या गोकुळात छान रमली होती. तिच्या तरुणपणातील हालअपेष्टा आणि कष्ट यांची जाण माझ्या चारही भावांना आणि वहिनींना असल्याने तिच्या म्हातारपणी तिला सगळ्यांनीच सुख दिलं. सुभाष शेंडेफळ त्यामुळे तिचा त्याच्यावर कांकणभर जीव जास्त. मी सुभाषसोबतच राहणार हे तिने आधीपासूनच बहुधा ठरवलेलं,  त्यामुळे चिपळूणला सुभाषसोबत आणि सुनेसोबत तिचं छान जमलं.  सगळं कसं उत्तम चाललेलं होतं तरीही, कुठेतरी मनात दिलिपदादाची काळजी होतीच. किरकोळ आजारानं त्याची बायको जग सोडून गेलेली. हे दु:ख पचवून हिराताई पुन्हा उभी राहिली तर सुनिलदादाच्या बायकोची काळजी मागे लागली. पण स्वत: धीर न सोडता सगळ्यांना आधार म्हणून हिराताईच उभी राहिली. शरीरावरती वय आणि कष्ट दिसत होते. सोबत मनही जरा डाकलक झालं होतं. बाहेर कोणाकडे जाण्याची उमेद हरवलेली, पण तरीही ती लवकर सावरली. अनिलदादा, दिलिप दोघंही निवृत्तीनंतर चिपळूणलाच स्थायिक होणार हे टॉनिक तिला पुरलं. मी नवीन घर बांधलं याचं तिला कोण कौतुक... दिवसभर हौसेनं वावरली. माझ्या मीठमोह-याच काढायच्या बाकी होत्या. 

मुलगे, सुना, नातवंडं, पतवंडं यांच्या गोकुळात रमलेली हिराताई बघितली की मन प्रसन्न व्हायचं. वाढत्या वयातही नातवंडांवरची जरब आणि माया जराही कमी झालेली नव्हती. पै पाहुणा, शेजारपाजार तिला हवा असायचा. मी तिला खूपदा म्हणायचो की अगं सुभाषला सांग सकाळी रिक्षातून माझ्याकडे सोडायला, रहा दिवसभर, जेव खा, गप्पा मार.  संध्ययाकाळी मी सोडीन... पण नाही, ती नंतर कधी आलीच नाही. विचारलं की म्हणायची, "अरे मी नाही जात घर सोडून कुठेही.. वाटतंच नाही जावसं कोणाकडे". तिच्या मनात काय सल होता तो कधी कळलाच नाही. 

”ताई हथरुणावर पडून आहे, बघून आलास काय?” बालाताई मला विचारत होती. दुपारी ऑफिसला जाण्याआधी मी हिराताईचं घर गाठलं. तिची निस्तेज अशी कुडी बघून मलाच भडभडून आलं. “बरेच दिवस अन्नच सोडलंय... घोटभर चहा, चार चमचे पेज, ज्यूस यावरच आहे. काही दिलं तरी खात नाही” घरची मंडळी सांगत होती. बळेबळे चहा पाजला, गप्पा मारल्या पण ती नेहमीची हिराताई नव्हती. कुठेतरी ट्रान्समधे हरवलेली.. “परत येतो उद्या तुला भेटायला” असं सांगून बाहेर पडलो. संध्याक़ाळी घरी आलो, खूप सा-या आठवणी उचंबळून आल्या त्या शब्दबद्ध करायला घेतल्या. अर्ध्याहून अधिक उतरवूनही झालं. तिच्यावर लिहिलेलं तिलाच वाचून दाखवायचं होतं पण अर्ध्यावरती शब्दच हरवले. हिराताईला पैलतीरावरचे बापू हाका मारताना दिसत होते. ऐलतीर कधीही सुटेल अशी स्थिती होती. अर्धवट राहीलेलं परत लिहायचा प्रयत्न केला परंतु सरस्वती माझ्यावर पुन्हा प्रसन्न झालीच नाही.
 
17 तारखेला बालाताईकडे परत एकदा चौकशी केली, परिस्थिती जैसे थे असल्याचं कळलं. पुन्हा एकदा भेटून येऊ असा विचार करत असतानाच संध्याकाळी कळलं.. “हिराताई गेली...” बालपणातला मायेचा धागा तुटला. डोळ्यात खळ्ळकन पाणी आलं. कोणतीही अपेक्षा न ठेवता माझ्यावर आपल्या मुलांपेक्षाही कांकणभर सरस प्रेम करणारी माझी हिराबा गेली... 

वासांसि जीर्णानि यथा विहाय 
नवानि गृण्हाति नरोSपराणि ||
तथा शरीराणि विहाय जीर्णा 
नन्यानि संयाति नवानि देही ||

॥ ॐ तत्सद ॥  


मनोज भाटवडेकर
२१.०९.२०२०

Saturday, August 22, 2020

शरण तुला भगवंता....

वेणूआजीच्या येरझाऱ्या सुरुच होत्या. सूर्य पश्चिमेकडे कलला. पावसामुळे अधिकच अंधारलेली संध्याकाळ मनाची घालमेल करत होती. पावलं वाजली तशी वेणूआजी पाय ओढीत दरवाज्याकडे गेली. दबक्या पावलानं येणाऱ्या मांजरीची पावलं ऐकू आली पण ऐकू येऊ शकणारी पावलं मात्र अजून ऐकू येत नव्हती. उद्यावर गणपती आले तरी मनाला प्रसन्नता नव्हती. सरावाने बहुतेकशी तयारी करुन झाली होती पण एकट्या घराला पन्नास वर्षांपूर्वीची ती धांदल, गडबड आता पारखी झाली होती. बघताबघता वेणूआजी भूतकाळात गेली. 

वृद्ध सासू, नवरा, दिर, चार मुलं असं गोकूळ होतं हे घर... सणवार अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडायचे. गणपतीच्या दिवसात तर कंबरेचा भुगा व्हायचा. दहा पिढ्यांची परंपरा तोंडपाठ असणारी सासू होती.. मनानं अगदी प्रेमळ पण वयाने शरीराची धनुकली केलेली. कपाळीचं कुंकू किर्तनाची परंपरा चालवत होतं, त्यामुळे खर्चाची तोंडमिळवणी करताना जीव अगदी मेटाकुटीला यायचा. दारासमोरच गोठा होता त्याचं दुधदुभतं घरी खाऊन उरेल ते विकून चार पैसे कनवटीला लावता यायचे. परसांव मोठं होतं तिथे पावसात भाज्या करायच्या त्या अगदी दिवाळीपर्यंत तोंडी पुरायच्या.... थंडीत केलेले कुळीथ, मूग, पावटा वर्षभर पुरायचा. संपन्नता नव्हती पण विपन्नावस्था नक्कीच नव्हती. माहेर असं उरलंच नव्हतं त्यामुळे सासरचे संस्कार, परंपरा जोपासण्यात वेणूआजीचं अवघं आयुष्य गेलेलं... चैत्रातल्या हळदीकुंकवापासून जी सुरुवात व्हायची, ती रामनवमी, हनुमानजयंती पार पडेतो चातुर्मासातल्या व्रतवैकल्यासाठी कोणाचातरी डेरा पडायचा. पाठोपाठ गणपती, नवरात्र, दिवाळी, शिवरात्र आणि मग शिमगा... वेणूआजीला उसंत नसायची. शिरुभाऊंची किर्तनसेवा चालूच होती. मुलं मोठी होत गेली. सासूने इहलोकीची यात्रा संपवली. जावई आले, नातवंड आली.. पाठोपाठ सून आली पण घरात बाळपावलं पडायच्या आत कर्ताधर्ता मुलगा गेला. सुनेनं पाठ फिरवली तरी वेणूआजी डगमगली नाही. वृद्ध दिर आणि सौभाग्यासाठी ती राबतच राहिली. मुली, जावई येऊन जाऊन होते. थोरलीची मदत होतीच भरीला दिराची पेन्शन असल्याने घरात चार दिडक्या खेळत्या राहिल्या. वेणूआजी म्हातारपणाकडे झुकली आणि अचानक दिराने देह ठेवला. आता त्या घरात दोघंच उरली. खेडेेगाव असल्याने दारावरुन जाणा-या येणा-यासाठी हक्काच्या घराचे दरवाजे सताड उघडेच असायचे. वाडीतल्या लोकांची ओटीवर उठबस व्हायची तेवढाच विरंगुळा.

"वेणूआजी, अगं पाट दे... मूर्ती आणून ठेवतो" शेजारच्या मुलांचा पुकारा ऐकून आजी तंद्रीतून जागी झाली. "हो, खरंच की, मूर्ती आणून ठेवायला हवी".. असं म्हणत पाट, विडासुपारी, नारळ आणि वस्त्र देऊन आजी परत ओटीवर बसली. दारात झोपाळा होता पण कधी बसायला वेळच मिळाला नाही आणि मग पुढे सवय नाही म्हणून गरगरायचं.. वेणूआजी त्या झोपाळ्याकडे बघताबघता पुन्हा तंद्रीत गेली. 

नैवेद्यासाठी मोदक हवेत म्हणून खूपदा थोरली मदतीला यायची. तिच्या घरी पण गोतावळा खूप, मग वेणूआजीची एक मैत्रीण होती ती आणि आजी मिळून मोदक करायच्या. बघताबघता पाच दिवसांंचा गणपती हळूच दीड दिवसावर आला. थोरलीची जबाबदारी मधली आणि धाकटीनं आपल्या शिरावर घेतली. शिरुभाऊंना गणपतीची उस्तवार कठीण होऊ लागली म्हणून मग थोरलीचा लेक घरचा गणपती बसवून आजोळचा गणपती बसवायला यायचा. आता मात्र नोकरीमुळे ही कसरत त्यालाही कठीण होऊ लागली. 
वृद्धत्वानं एके दिवशी वेणूआजीच्या हातातला शिरुभाऊंचा हात आपल्या हाती घेतला आणि मग आजी अगदीच एकटी पडली. म्हातारपण कान आणि गुढगेदुखीच्या रुपात खुणावत होतं तरी वेणूआजीचा एकटा हात घरावर फिरत होता, सणवार पार पाडले जात होते. गेली चार वर्ष खूपच दगदग होते आहे हे पाहून मधलीनं आईला फर्मावलं... "यावर्षी गणपतीला प्रार्थना कर. इतकी वर्षे सेवा केली पण आता नाही झेपत. यावर्षीची ही अखेरची सेवा गोड मानून घे"
आवाहनम् न जानामि न जानामि तवार्चनम्।
पूजाम् चैव न जानामि क्षम्यताम् परमेश्वर।।

मंत्रहीनम् क्रियाहीनम् भक्तिहीनम् सुरेश्वर।
यत्पूजितम् मया देव परिपूर्णम् तदस्तु मे।।

अन्यथा शरणम् नास्ति त्वमेव शरणम् मम।
तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर।।

वर्षानुवर्षे गणपती पूजा सांगणारे भार्गवगुरुजी खर्जातल्या स्वरात प्रार्थना करत होते. मनाची चलबिचल, अस्वस्थता मागे टाकून वेणूआजीने एकदाचा धीर केला आणि गुरुजींना थांबवले. मधलीचा मानस ती आपल्या मुखाने व्यक्त झाली खरी पण डोळ्याला लागलेल्या धारा आणि रुद्ध झालेला कंठ तिला पुढे बोलू देईना. चमत्कारिक परिस्थितीत सगळे अवघडून उभे असतानाच धाकटी पुढे झाली. "गुरुजी, ही म्हणत्ये ते खरं असलं तरी तिचं मन ते स्विकारणार नाही. सणवार, उत्सव यापुढे पार पाडताना कठीण होणार असलं तरी या वयस्कर लोकांचं जगण्याचं हेच बळ आहे. करु काहीतरी आम्ही. पुढच्या वर्षाचं पुढल्या वर्षी बघू पण आत्ताच प्रार्थना करुन तिला विरक्त नका करु. नाही जमणार तिला ते" धाकल्या जावयानं पण मान डोलावली. वेणूआजीच्या डोळ्यात निराळीच चमक आली. घोगरा झालेला आवाज मोकळा झाला. गुरुजी पण गालातल्या गालात हसले आणि मंत्रपुष्पांजली म्हणू लागले.
 
"गणपती बाप्पा मोरया"... जोराचा गजर झाला.. वाडीतली मुलं गणपती घेऊन दारात उभी होती. पायावर दूधपाणी वाहून मुलांंना आत घेतलं. नेहमीच्या जागेवर बाप्पा विराजमान झाले. परातीत चिवडा ओतून मुलांच्या समोर धरत वेणूआजी प्रत्येकाची चौकशी करत होती. "उद्या येतांव आरतीला, भरपूर प्रसादी करुन ठेवा" फर्माईश करुन मुलं पसार झाली. अंधार दारा खिडक्यांमधून घरात घुसला तशी आजीने चारीठाव दिवे लावले. शुभंकरोती म्हणून देवाला हात जोडले तरी उद्याची चिंता काही मिटली नाही. भार्गवगुरुजींचा निरोप होता, उद्या सकाळी नऊ वाजता येणार असल्याचा. म्हणजे सकाळी उठल्यावर बाकी तयारी केली तरी चालणार होती पण मग आत्ताची अस्वस्थता जायला म्हणून आजी फुलवाती वळायला बसली. "हे असते तर आत्तापर्यंत चार वेळा चहा टेकायला लागला असता आणि मग प्रत्येक चहानंतर पान चुरडायला हवंच" आजी शिरुभाऊंच्या आठवणीत गुंतली. वाती झाल्या, समया सजल्या. "तरीच म्हटलं काहीतरी विसरलंय, गणपतीला कापसाची वस्त्र राहिली." तीनफेरी वस्त्र करुन झालं, ताम्हन भरलं, विडे, सुपारी, पत्री, नारळ, हळदकुंकू, अबीर, बुक्का.... सगळ्या तयारीवर आजीची नजर फिरली आणि चेहऱ्यावर खुशी आली. "यांना अशी साग्रसंगीत तयारी लागायची, चालवून घेणं अजिबात जमायचं नाही. पण खरं सांगायचं तर त्यातही एक आनंद होता" उसासा टाकून वेणूआजी वळली तर दारात धाकलीचा लेक हजर... आsज्जीsss करत आत आला. "गणपती गजानना, तूच तुझी सेवा करुन घेतोयस रे.... अरे, मला उद्याच्या पूजेची काळजी आणि तू इकडे छान पाटावर बसून निवांतपणे व्यवस्था करुन मोकळा... तुलाच रे बाबा माझी काळजी..." 
"काय वेणूआजी? यंदा करायची का प्रार्थना?" भार्गवभटजी मिश्कील आवाजात विचारत होते.
"माझा हा नातू असेपर्यंत मनात सुद्धा नका आणू.. साग्रसंगीत होऊ द्या पूजा..." आनंदविभोर वेणूआजी उत्तरली. 

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता। विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी । गणपती बाप्पा मोरया ॥

Monday, August 3, 2020

Noble… Thy name is Ashraf

Noble… Thy name is Ashraf

आजपासून साधारण अठरा वीस वर्षांपूर्वी कोणीतरी ओळख घालून दिली, "हा अशरफ देसाई" बँकेत नोकरीला आहे आणि आपल्या चिपळूण शाखेचा एजंट आहे. मध्यम उंची, लख्ख गोरा वर्ण, टापटीप ब्रँडेड पोशाख आणि आसपास दरवळणारा सुगंध ही अशरफची ओळख. या ओळखीनंतर बँकेतील नोकरी सांभाळून एजन्सी करत अशरफ भेटतच राहीला.  

खालचा ओठ आत वळवून काढलेले टिपिकल कोकणी मुस्लिम उच्चार, समोरच्याची मस्करी करण्याची ढब, आपल्यावर केलेली कोटी उलटवण्याची त्याची एक खास पद्धत. अत्यंत दिलदार असा अशरफ त्याची दूरवर झालेली बदली नाकारुन पूर्णवेळ विमाप्रतिनिधी बनला. घरुन आरिफाभाभींचा पाठिंबा होताच, पण समाजाच्या सर्व थरात संचार असल्याने अशरफला हा निर्णय घेणे जड गेले नाही.

अनेक निमित्ताने अशरफचा आणि माझा स्नेह वाढत गेला. अहोजाहोचं नातं अरेतुरेमधे बदललं. कोणालाही मदत करताला त्याच्या तोंडी कधी नकार नसायचा. 2007 ला माझ्या नवीन घराच्या कर्जप्रकरणावेळचीच गोष्ट. जामीनदार म्हणून मला एक चेअरमन क्लब मेंबरची आवश्यकता होती. कोणाला विचारु असा विचार करेपर्यंत अशरफ समोर आला. सहज म्हणून विचारलं तर दुस-या सेकंदाला कानावर होकार पडला. अक्षरश: जामीनदार हा विचार मनात येतोय तोवर त्याची पूर्तता देखील झाली. अशरफ रोज चिपळूण शाखेत यायचा. माझं ऑफिसही त्याच इमारतीत तळमजल्यावर असल्याने सतत भेटीगाठी व्हायच्या. एजंटांच्या भिशीमधे माझ्या पाठीमागे लागून मला अशरफने नेले आणि मग मैत्रीचं वर्तुळ आणखी विस्तारलं. 2010 ला सातारा येथे आम्ही तीन दिवसांचे संयुक्त ट्रेनिंग केले आणि मग हा सिलसिला सुरुच झाला. 

एकदा अशरफच्या घरी गेलो होतो. समोर एक चाकं असलेली नवीकोरी ट्रॉलीबॅग पाहिली. सहज म्हणून विचारलं की कुठून आणलीस रे? खरंतर ती बॅग अशरफच्या भावाने दुबईहून आणली होती. तुला आवडली असली तर घेऊन जा, मी दुसरी आणीनअशरफच्या अंगात दानशूर कर्ण अवतरलेला. त्यावेळी तिची किंमत किमान चार हजाराच्या वर असणार होती. मी अर्थातच नकार दिला आणि भाऊ जेव्हा परत कधी येईल तेव्हा येताना आणायला सांगितली. योगायोग असा की त्याचा भाऊ पुढच्याच आठवड्यात येणार होता. अशरफ़ने लगेच त्याला माझ्यासमोरच फोन केला आणि पठ्ठ्या एकास दोन बॅग्ज आणायला सांगून मोकळा.

ब्रँडेड वस्तूंचं अशरफला अतोनात वेड होतं. उत्तम क्वालिटीचे कपडे, बेल्ट इ.खरेदीची त्याला आवड होती आणि मुख्य म्हणजे पारखही होती. त्याच्या ब्रँडेड या शब्दावरुन आम्ही त्याची खूप थट्टाही करायचो. 2017 साली मी अशरफला जयपूरला ट्रेनिंगला घेऊन गेलो होतो. सोबत अभय, नामदेव, संतोषही होते. एका संध्याकाळी आम्हा बाकीच्या मंडळींची खरेदी आटपली तरी संतोषला मनासारखं काही मिळालं नव्हतं. आम्ही सगळेच कंटाळलो. पण अशरफ त्याला रिक्षात घालून एका ब्रँडेड दुकानात घेऊन गेला आणि खरेदी करुन आला. आमचं ट्रेनिंग जयपूरला असल्याने जवळच एक दिवस अजमेरला जाऊन येऊया असा लकडा त्याने लावला. थंडीचे दिवस असल्याने दाट धुक्यात संध्याकाळी तिकडे गाड्या चालत नाहीत. जायला मिळत नाही म्हणून तो मायूस झाला पण ते अगदी थोडावेळ. जरा वेळाने तो लोकल साईटसिईंगमधे तह-ए-दिलसे शरिक.. ट्रेनिंगचे दिवस संपल्यानंतर आम्ही सगळे माझ्या मित्राच्या कृपेने जैसलमेर, लोंगोवाल पोस्ट, पाकिस्तान बॉर्डरपर्यंत जाऊन आलो. आठवडाभराची ती ट्रीप कधीच विसरणार नाही इतकी आम्ही धमाल केली होती. अशरफला कायम हसतमुख असण्याची देणगी बहुधा वडीलांकडून मिळाली असावी. युसुफचाचा निवृत्त तहसीलदार.. त्यामुळे जमीन वगैरे बाबतीत नियमावली अगदी तोंडावर असायची. जगन्मित्र असल्याने ओळखी अचाट. आम्हा सगळ्यांशी भरपूर गप्पा मारायचे. प्रत्येक वडीलांना मुलाचं कौतुक असतंच, त्याला युसुफचाचा कसे अपवाद असतील? आमच्याशी अगदी भरभरुन बोलायचे. मुलाचं कौतुक सांगायचे.

मध्यंतरीच्या काळात अशरफच्या प्रकृतीच्या किरकोळ कुरबुरी झाल्या. काही व्याधींनी जरा मोठं रुप घेतलं. या दिलदार मित्राचं काळीज उघडून बघण्याची वेळ आली पण देवदयेने साफसफाईवरच भागलं. रोजचं चालणं, गोळ्या आणि पथ्य या त्रिसुत्रीवर त्याची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली. अशरफ पुन्हा हिंडताफिरता झाला. पूर्वीच्याच जोमाने काम करायला लागला. मी, संतोष, राजेश आम्ही सगळे सारखे त्याच्या पाठी लागायचे की तू तुझं स्वत:चं ऑफिस सुरु कर. स्टँडजवळ तुझी स्वत:ची जागा आहे तर आम्हाला तुला तुझ्या कार्यालयात बसलेला पहायचंय. स्वत:चं ऑफीस या गोष्टीशी त्याचं काय शत्रुत्व होतं माहिती नाही पण तो योग कधीच आला नाही. मात्र असिस्टंट, आँफिस नसतानाही रेकॉर्ड कसं सांभाळावं ते अशरफकडून शिकावं इतकं छान तो मेन्टेन करायचा...

अशरफ मिस्किल होता. कितीही तणाव असूद्या असं काही वागायचा, बोलायचा की रडका मूड जाऊन हास्यरसाचे फवारे उडालेच पाहिजेत. गतवर्षीचीच गोष्ट.. चौदा जणांचा एक ग्रुप घेऊन मी लद्दाखला जायचो होतो. मी सोडून बाकीचे प्रथमच जाणार होते.  तारीख ठरली होती 05 ऑगस्ट 2019. पण 25 जुलैपासूनच पावसाने हलकल्लोळ माजवला होता. त्यात अचानकपणे काश्मीर खोरं बंद झालं, कलम 370 रद्द होण्याची भर पडली. संपूर्ण टूर रद्द होण्याची चिन्हं दिसत होती. जायची तारीख दोन दिवसांवर आली तरी अडचणी कमी होण्याऐवजी गुणाकाराने वाढत होत्या. त्यातच एजंट संघटनेची मिटींग कोल्हापूर येथे नियोजित होती. नेमकेपणाने सांगायचं तर आजचीच 03 ऑगस्ट 2019 ही तारीख होती. भरपावसातून अशरफ, मी आणि बाकी तीन एजंट आंबा घाटातून कोल्हापूरला निघालो होतो. माझा एकंदर मूड त्याच्या लक्षात आल्यासारखी त्याची अखंड बडबड चालली होती. पुढे नाश्त्यासाठी आंबा येथे थांबलो. आमचा नाश्ता संपत आला तरी अशरफ आणि एक एजंट गायब... घडलं असं होतं की मिसळीत पिळायला घेतलेलं लिंबू हातातून सटकून मिसळीत पडलं आणि अशरफच्या पांढऱ्याशुभ्र शर्टावर रंगीत नक्षीकाम झालं होतं. लिंबू, साबण लावून पण डाग जाईना
म्हणून समोरच्या दुकानातून साबण पावडर आणून हाँटेलमधल्या एका पातेल्यात शर्ट भिजवण्याचा आणि धुण्याचा कार्यक्रम चालला होता. घडलं हे कमी की काय म्हणून साबण पावडर टाकणा-याने अख्खा पाऊच ओतला होता. त्यामुळे डाग राहिला बाजूला, पण शर्टातून साबण काढण्याचाच व्याप झाला. कितीही पाणी ओतलं तरी पातेल्यातून फक्त फेसच बाहेर पडायचा. उघडाबंब अशरफ शर्ट धुतोय आणि आम्ही आळीपाळीने पाणी घालतोय... सगळाच प्रकार विनोदी.. हसून हसून मुरकुंडी वळलेली... एकदाचा तो डाग गेला पण आता ओला शर्ट घालणार कसा? म्हणून अखेरीस अशरफ उघडाबंबच गाडीत बसला. वारणानगर येईपर्यंत आम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला इस्त्रीवाला शोधत होतो. अखेरीस दुकान मिळालं आणि इस्त्री कडकडीत तापवून शर्ट वाळवावा लागला.. प्रसंग आठवला की उकळी फुटल्यागत आम्ही सगळे हसायचो. आमच्या सोबत अश्रफ पण हसायचा. एकदाचे आम्ही कोल्हापूरला पोचलो आणि अचानक लक्षात आलं की गेले दोन अडीच तास मी एकदम तणावमुक्त आहे. घडलेल्या प्रसंगात जराही चिडचिड न करता तो छान एन्जॉय करत होता आणि मलाही हसवत होता....

मिटींग वगैरेसाठी कुठेही जायचं झालं की अशरफला हमखास उशीर व्हायचा. मग राजेश चिडायचा. त्याची आणि अशरफची जुगलबंदी सुरु व्हायची. पण थोड्या वेळाने त्याचा मागमूसही नसायचा. एकदा महेशने हळूच पुडी सोडून दिली की अशरफ स्मशानात यायला भितो, येत नाही तो. कोणीतरी त्याला भिशीत विचारलं तर महेशवर जाम वैतागला.. अशरफला उचकवायची किल्लीच मिळाली सगळ्यांना. पण त्याच्या लक्षात आल्यावर त्याने तेच हत्यार महेशवर उलटवलं आणि स्वत: एक पुडी सोडून दिली की महेश एजन्सी बंद करतोय, रिटायर व्हायचं म्हणून आवरतं घेतोय... महेशला हैराण करुन सोडलं त्याने... असे कितीतरी प्रसंग अनेक एजंट सांगतील. खरंच... most lovable, Noble & honourable होता अशरफ... अशरफ या अरेबिक शब्दाचा अर्थच मुळी आहे Noble or most honourable. नावाप्रमाणेच अशरफ कायम नावाला जागला, आणि तसाच जगला पण.

"अशरफला कामथ्यात अँडमीट केलंय" पलिकडून काप-या आवाजात महेश फोनवर सांगत होता. "एकच दिवस ताप आला पण खूप अशक्तपणा आलाय.." पुढची वाक्य कानावर पडत होती पण मेंदूपर्यंत पोचू नयेत अशी दहशत वाटायची कामथे हाँस्पिटल म्हटलं की. “मी निघतोय” असं सांगून फोन ठेवला. फार लांब नसल्याने पाचच मिनिटात काँटेजला पोचलो. राजेश आधीच पोचला होता. नेहमीच्याच सुरात अशरफची थट्टामस्करी सुरु होती. मला बघितल्यावर म्हणाला, "आमच्या समाजाने हा कोरोना वार्ड तयार करुन दिलाय आणि पहिला पेशंट मीच"  आँक्सिजन देणं सुरुच होतं तरीही पल्सआँक्सिमीटर आँक्सिजन सँच्युरेशन फक्त 85 ते 90% दाखवत होता.  स्थिती चिंताजनक नव्हती तरी सामान्य नक्कीच नव्हती. रिपोर्ट मिळण्यात झालेला विलंब लक्षात घेऊन रत्नागिरी सिव्हिल हाँस्पिटलला हलवण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला आणि तो योग्यच होता. “चारपाच दिवसात ठणठणीत होऊन चिपळूणला येशील” असं म्हणणारे आम्ही, रुग्णवाहिका आल्यावर खुर्चीतून उठून आपणहून आत बसणा-या अशरफचं ते जिवंतपणीचं शेवटचं दर्शन घेत होतो हे मात्र आम्हाला तेव्हा कळलं नव्हतं. रोज अशरफ फोनवर बोलायचा. तब्येत ठिक आहे सांगायचा.

17 तारखेला माझ्या मुलाच्या बारावी निकालाचे पेढे वाटत असतानाच फोन आला, अशरफ गेला”. एक क्षण कळलंच नाही, गेला म्हणजे? कुठे? दुसऱ्या क्षणी हातातून गळून पडणारा बाँक्स सांभाळला. दरवाजाचा आधार घेत स्वतःला सावरलं.  किमान चार ठिकाणाहून खातरजमा केली, प्रत्येक ठिकाणी तीच मनहूस खबर होती, अशरफ जिंदगी की जंग हार चुका”।  कातिल कोरोनाने अशरफचा घास घेतला होता. सरकारी सोपस्कारामुळे अंत्यदर्शन नाही की मूठमाती नाही. कोरोनाच्या भितीनं अवघ्या समाजाला असं ग्रासलेलं की इच्छा असूनही कुटुंबीयांना धीर देण्यासाठी कोणी जाऊ शकत नाहीये. दोन्ही मुलगे घरापासून दूर. तेही येऊ शकले नाहीत. अत्यंत अवघड परिस्थितीत असताना अशरफ सगळ्यांना सोडून गेलाय. आता काळजी आहे ती युसूफचाचा, भाभी आणि अशरफच्या मुलीची. अशरफचं जाणं यापैकी कोणीच स्विकारलेलं नाहीये आणि या कालखंडात ते अवघडही आहे.

हा आघात ते कसे सोसणार आहेत हे त्या अल्लातालालाच माहिती...

आमेन..

ता.क. गतवर्षीच्या कोल्हापूर प्रवासातल्या आठवणी 03 ऑगस्टशी निगडीत असल्याने आज हा लेख प्रसिद्ध करायचा असं ठरवलं होतं. पण ज्या दिवशी हा लेख लिहिला त्याच्या दुस-याच दिवशी युसुफचाचा अल्लाला प्यारे झाले.  दुनियाका सबसे बडा बोझ, बापके कंधे पे बेटे का जनाजा, ना वो सह सके, ना वो उठा सके।  परमेश्वर आणखी किती परिक्षा पाहणार आहे हे त्यालाच माहिती.

मनोज भाटवडेकर 
# 9421253153

03.08.2020




Saturday, May 9, 2020

आमची लडाखवारी भाग - ३


लडाखमधे प्रवेश केल्यानंतर आपल्याला सर्वत्र बौद्ध संस्कृतीची धार्मिक बांधकामे दिसतात. या धार्मिक स्थळांना मोनेस्ट्री किंवा तिबेटी भाषेत गोम्पा म्हणतात. गावापासून थोडंसं दूर पण नजरेत गांव बसेल अशा उंचीच्या पहाडावर छोट्या छोट्या इमारतींचा समूह म्हणजेच मोनेस्ट्री किंवा गोम्पा. आपण जेव्हा त्याला भेट देतो तेव्हा त्याची वैशिष्ट्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. Chorten हा तिबेटी शब्द म्हणजे स्तूप. लडाखमधे प्रवेश केल्यापासून ठिकठिकाणी आपल्याला असे स्तूप दिसतात.  जुन्या काळी असे स्तूप बुद्धाचे अवशेष जतन करण्यासाठी बांधले गेले परंतु आता बोधिसत्वाचा आदर अथवा एखाद्या पूजनीय धर्मगुरुचे अवशेष जतन केले जातात. हे बांधकाम पंचतत्व, बौद्धमूर्ती आदी अनेक गोष्टींशी साधर्म्य दाखवतं. मोनेस्ट्री च्या आवारात आपल्या धार्मिक वचनं लिहीलेल्या पताका फडकताना दिसतात.
केवळ मोनेस्ट्रीच नाही तर वृक्ष, पूल, आणि खिंडीच्या माथ्यावर देखील विहरताना दिसतात. निरनिराळ्या रंगाच्या कापडी पताका चटकन लक्ष वेधून घेतात. काही ठिकाणी भलामोठा ध्वज फडकताना पण दिसतो. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या सर्व प्राणिमात्रांच्या भल्यासाठी त्यावर धार्मिक चिन्हं अथवा प्रार्थना छापलेल्या असतात. घाटमाथ्यावरुन प्रवास करणारे सुखरुप राहावेत अशासाठी खिंडींमधे पण पताका लावल्या जातात.
लडाखमधल्या विरळ वातावरणाला सरावायचं असेल तर हा प्रवास खरंतर श्रीनगर पासून सुरु करावा. परंतु कलम 370 ने आमचा प्लँन कलम केला. आम्ही विमानाने थेट लेहला उतरलो. आला दिवस झोपूनच काढला होता. आजचा दुसरा दिवस स्थानिक स्थलदर्शनासाठी ठेवला होता. 
सकाळी पहिलीच किरणं डोळ्यावर आली आणि मंडळी उठून आवरायला लागली. भरपेट नाश्ता करुन गाडी निघाली. लडाखमधली सर्वात जुनी म्हणजे 1630 मधे स्थापन झालेली आणि तितकीच श्रीमंत असणाऱ्या हेमिस मोनेस्ट्रीसाठी आम्ही निघालो. मनाली रस्त्याने कारु येथे पोचल्यावर मनाली रस्त्याशी काडीमोड घेतला आणि सिंधू नदी ओलांडून गाडी पहाडी रस्त्याला लागली. सुमारे पाच किमी अंतर कापल्यावर खाणाखुणा दिसू लागतात.
हेमिस मोनेस्ट्री ही इतर मोनेस्ट्री प्रमाणे डोंगराच्या टोकावर नसून पुढे आलेल्या धारेच्या आड लपलेली असल्याने अगदी जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. आपण गाडीतून उतरतो आणि जेमतेम पाचपंचवीस पाय-या चढलो की मोनेस्ट्रीच्या प्रांगणात आपला प्रवेश होतो. हेच ते प्रांगण जिथे प्रसिद्ध हेमिस उत्सवाचे कार्यक्रम साकार होतात.  लडाखमधील बहुतांश मोनेस्ट्रींचे उत्सव हिवाळ्यात असतात पण हीच एकमेव जिचा उत्सव उन्हाळ्यात म्हणजे जून, जुलैमधे असतो.
उत्सवावेळी या प्रांगणात पाय ठेवायला जागा नसते. ड्रम आणि तिबेटी शिंगांच्या आवाजावर नृत्याविष्कार दाखवले जातात. विशिष्ट पेहराव आणि मुखवटे घालून केलेले नृत्य हेच खरे या उत्सवाचे आकर्षण. अगदी पुरातन असल्याने ह्या मोनेस्ट्रीला सर्वाधिक महत्त्व आहे. हेमिस नंतर आपण सिंधूच्या दक्षिण तीरावरुन लेहकडे जाऊ शकतो... जाताना मथो काँगरी, स्तोक काँगरी ही शिखरं आपली सोबत करतात. आम्ही लेहवरुन थेट आलो असल्याने पुन्हा सिंधू ओलांडून उत्तर तीरावरुन आमचा प्रवास सुरु झाला. थिक्से पँलेस मधील मैत्रेय बुद्धाचा दुमजली पुतळा पाहून आम्ही शे पँलेसकडे सरकलो.
उन्हं अगदी डोक्यावर आल्यामुळे शे पँलेस बाहेरुनच पाहून प्रसिद्ध चित्रपट थ्री इडियटच्या शाळेजवळ आम्ही पोचलो. येणाऱ्या पर्यटकांमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून आता प्रवेशद्वाराजवळच एक डमी इमारत आणि त्यावर हुबेहूब चित्रं रेखाटली आहेत... सेल्फी और ग्रुप फोटो तो बनता ही था।... जवळच्याच कँफेटारियामधे सँडवीच, मोमोज्, थुक्पा खाऊन पोटं भरली.
लेहजवळचं चोगलमसार हे ठिकाण सिंधू उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. स्व.अटलजींच्या संकल्पनेतून सुरु झालेला हा महोत्सव दरवर्षी जून महिन्यात सिंधूपूजनाने सुरु होतो. हिंदूधर्मियांना वंदनीय असलेल्या सिंधूचे पाणी प्रोक्षण करुन तिला नमन केले. खुद्द लेह शहरात अनेक पर्यटनस्थळं आहेत. समस्त भारतीयांना अभिमान वाटावं असं एक म्हणजे हाँल आँफ फेम हे भारतीय लष्कराचे संग्रहालय.
इथे भारतीय सैन्याची शौर्यगाथा सांगणारे अनेक फोटो, शस्त्रं, पोषाख ठेवलेले आहेत. तिथल्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात यासाठी एक वस्तू विक्री केंद्रही आत आहे. आम्ही यानंतर झोरावर फोर्ट आणि शांति स्तूप पाहणार होतो पण नुकताच हाँल आँफ फेम इथे साउंड अँड लाईट शो सुरु झालाय. बाकीचं नंतर पाहू पण हे आज पाहू या विचाराने आम्ही थांबलो. अर्थात हा निर्णय अत्यंत योग्य ठरला. अंगावर रोमांच आणणारा ध्वज उतरवण्याचा कार्यक्रम व त्यापाठोपाठचा हा शो डोळ्यांची पारणं फेडतो. एकाचवेळी सैनिकांचा जिवंत देखावा आणि पडद्यावरची कहाणी सारा आसमंत भारुन जातो.
भारतीय सैन्य आणि त्यांच्या शौर्यगाथा यांनी अंगावर आलेले रोमांच जपत आम्ही हाँटेलवर परतलो. प्रत्येकाच्या मुखी  एकच विषय होता. पुढ्यात आलेले गरमागरम जेवण हादडल्यावर आमची अंताक्षरी रंगली. बोचऱ्या वा-यानं हळूच कानात उत्तररात्र सुरु झाल्याचं सांगितलं आणि सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये परतले.

मनोज
०७.०८.२०१९

Monday, April 20, 2020

स्वच्छंदी कलंदर....


॥ श्री ॥


उभाभ्याम् उतते नमो। 
उभाभ्या मुतते नमो।

उभाभ्याम् उतते नमो।
उभाभ्या मुतते नमो।

कोणाचा बापूस मुततोय उभ्यानं?... भिकारभांचोद साले..
चारवेळा सांगितले  "उभाभ्याम् उतते नमो" तरी पुन्हा "उभाभ्या मुतते?..." अण्णा कडाडले. 

घनुअण्णांकडे रुद्राची संथा घेणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी अशा शिव्या खाल्ल्याशिवाय आपली रुद्राची संथा पूर्ण केलीच नसेल.

पागेवरची जोशी आळीतील ब-यापैकी भिक्षुकांची घरं.. पण केवळ भिक्षुकीच करावी म्हणून नाही तर जिभेला चांगलं वळण लागावं, जोडाक्षरांमुळे वाणी शुद्ध व्हावी यासाठी सुरुवातीला अगदी रामरक्षेपासून ते संपूर्ण याज्ञिकीपर्यंत संध्याकाळी मुलांना कोणाकोणाकडे पाठवलं जायचं. जसा घरोबा तशी मुलांची संख्या असायची. पण रुद्र, महिम्न इ.साठी घनुअण्णाच.. त्याकाळी चातुर्मासात वामनभटजींसारखी दिग्गज मंडळी पागेमधे वास्तव्यास असायची. तीही मंडळी वैदिक सूक्तं शिकवायची. पण वर्षभराचं व्रत फक्त अण्णांनी पत्करलं होतं.

कृष्णेश्वर मंदीराला लागूनच घनःशाम वासुदेव उर्फ घनुअण्णा भागवत यांचं घर... पुलं म्हणतात तसं, मूळ नावाने आमच्याकडे फारसं कोणी कोणाला संबोधत नाही. त्यामुळे हाक मारायच्या नावाचं, त्या मूळ नावाशी आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या स्वभावाशी सख्य असेलच याची खात्री नाही. आम्ही मुलं सुटीमधे देवळात पत्ते खेळायचो. शेजारी अण्णांचं घर आहे याची जाणीव सुरुवातीच्या काही डावांनंतर सुटायची आणि आवाजाने झोपमोड झालेले अण्णा दबक्या पावलाने देवळात शिरायचे. अण्णा आले हे कळेपर्यंत उशीर व्हायचा आणि मग दाणादाण उडायची. कोणाची तरी गचांडी धरली जायची, त्यानंतर मग अ ते ज्ञ पर्यंतच्या शिव्यांची लाखोली आणि कधीतरी तोंडी लावायला पाठीत धपाटा बसायचा. जी गत पत्त्याच्या खेळाची, तीच डबा ऐसपैसची. रस्त्याच्या पलिकडे देवळाचं परडं, तिथेच क्रिकेट खेळायचो, विटीदांडू खेळायचो.. पण लोखंड जसं लोहचुंबकाकडे खेचलं जातं ना, तसे आमचे बाँल, विट्या त्यांच्या घराच्या अंगणात जायचे. परत आणायला वाघाच्या गुहेत कोण जाणार, पेक्षा वस्तू नवीन आणण्याचाच मार्ग सोपा असायचा. एकंदरीत काय, आमच्या बालजीवनात घनुअण्णा म्हणजे शोलेतले गब्बरसिंग किंवा मि.इंडियातले मोगँबो.... हो, खरंतर मोगँबोच जास्त शोभले असते. 

अशा परिस्थितीत एकदा ती काळीकुट्ट संध्याकाळ उजाडली.  गीतेचे अध्याय शिकण्यासाठी आम्हा भावंडांची रवानगी अण्णांकडे झाली. रस्त्यावरुन आठदहा भक्कम पाय-या उतरुन प्रशस्त अंगण पार करुन ओटीवर बसायचं. पाय-या उतरण्यापूर्वी डाव्या हाताला रामाचं छोटेखानी मंदिर होतं. अंगणात खाली उतरताना बाजूला चाफ्याची झाडं होती. संध्याकाळी चाफ्याचा छान वास पसरलेला असायचा.  रामाचं दर्शन घेऊन कृष्णाचे उपदेश मुखी घटवण्यासाठी या घनःश्यामासमोर मी आणि माझी बहीण स्थानापन्न झालो. गाडी दोन स्टेशनं पार करुन तिसऱ्या अध्यायावर आली आणि आमचं दैव फिरलं. रामाच्या देवळाच्या मागे एक कुत्री व्यायली होती. आठपंधरा दिवसाची ती पिल्लं आम्ही गीता म्हणायला लागलो की केकटायला लागायची आणि आम्ही खुदखुदू हसायचो.. चारदोनदा आमचं खिखिखीखी ऐकून शीघ्रकोपी अण्णांनी आम्हाला अक्षरशः हाकलून दिलं आणि कृष्णाच्या उपदेशाला आम्ही मुकलो. एकंदरीत काय, अण्णा आमच्या मनातली त्यांची खलनायकी भुमिका हटवू शकले नाहीत. आम्ही मोठे होत चाललो आणि मग मात्र हा बरक्या फणसासारखा असणारा माणूस नव्याने कळत गेला.

घनुअण्णानी लष्करात नोकरी केली होती, ती दुसऱ्या महायुद्धानंतर सोडली. निवृत्तीनंतर आपल्या घरी गुरंढोरं, शेती, बि-हाडकरुंची भाडी आणि अगदी नंतरच्या काळात अल्पशी पेन्शन यावर गुजराण होत होती. सोबतीला अण्णांनी अनेक उद्योगधंदे केले, उद्योगधंद्यांप्रमाणेच अनेक नोक-या पण केल्या. मात्र प्रत्येक ठिकाणी स्पष्टवक्तेपणा, प्रामाणिकपणा किंवा सचोटी हे दुर्गुणच ठरले. 

अण्णाना तीन मुलं.. माधव, मुकुंद, आणि मंगल. माझ्या कळत्या वयात मुकुंददादा नोकरीमुळे मुंबईत, मंगलताई लग्न होऊन ती पण मुंबईलाच.. माधवदादा वीजमंडळातल्या नोकरीमुळे चिपळूण, दापोली, रत्नागिरी इथे राहीला. माधवदादाला नोकरी लागली आणि घरची आर्थिक घडी सुधारली. आमची काकू मंगलची आई याच संबोधनाने प्रसिद्ध.  मुलं चिपळूणच्या बाहेर असल्याने या दोघांच्या
सोबतीला घराच्या पडवीला बि-हाडं असायची. कालांतराने "आपल्याला एवढी जागा कशाला" म्हणून अण्णानी आपलं बि-हाड पडवीला हलवलं आणि राहती प्रशस्त जागा वीजमंडळाच्या एका कार्यालयाला भाड्याने दिली. एकंदरीत अण्णांचं छान चाललं होतं. सुस्पष्ट वाणी आणि वकिली मुद्दे यामुळे एखाद्याला सहजतेने बोलण्यात अडकवायचे पण तितक्याच आपुलकीने दोन कुटुंबात मध्यस्थी पण करायचे. त्यांनी कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, आणि केलंही नाही. 

टिपिकल कोकणी शिडशिडीत देहयष्टी, दंताजीचे ठाणे उठलेले, तोंडातल्या कवळ्या खुळखुळवत न्यम् न्यम् करत बोलण्याची स्टाईल,  डोक्यावर मोजके पण स्वभावाप्रमाणेच ताठ केस,  आळीच्या बाहेर फारसं बाहेर कुठे जाणं नसल्यामुळे चट्टेरी पट्टेरी अर्धी चड्डी, पैरण, हातात काठी आणि खांद्यावर टाँवेल हा कायमचा ड्रेस. कधीकधी चड्डीऐवजी उभे लावल्यागत अर्ध धोतर. रात्रीच्या वेळी चार सेलची स्टीलची बँटरी या सगळ्या साजात अँड व्हायची. बाजारात जाताना किंवा एखाद्या समारंभात जाताना मात्र त्या देहाला इतर कपडे चिकटायचे. जिभेला स्पष्टवक्तेपणा पेक्षाही फटकळपणाचीच बाधा जास्त आणि सोबतीला शिव्यांची खैरात, तशी ती बहुतांश कोकणी माणसाकडे असतेच. गावात येणंजाणं सगळ्यांकडे होतं पण हा माणूस स्वतःमधेच जास्त रमला. लष्कराच्या नोकरीमुळे वारुणीचं आणि सामिषाचं अजिबात वावडं नव्हतं..  त्यामुळे इतरांना काय वाटेल ही बाब त्यांनी आयुष्यभर फाट्यावरच मारली.
माझ्या वयाच्या बावीस तेवीशीत मला रुद्र शिकण्याची उपरती झाली. तोपर्यंत अण्णांचं भय वगैरे उरलं नव्हतं. त्यामुळे पावलं तिकडेच वळली. "आता कुठला तू रुद्र शिकणार... छट्.." अण्णा नाही म्हणून मोकळे झाले. संध्याकाळची आचमनं सुरु होती म्हणून मी विषय वाढवला नाही पण दुसऱ्या दिवशी "ती" संध्या सुरु व्हायच्या आधीच अण्णांना गाठलं. "मी आजवर रुद्र शिकवायचे कधी पैसे घेतले नाहीत. चारपाच डझनाहून जास्त पोरं शिकवली पण हल्ली शिकायला येणारा रुद्र अर्धवट टाकून जातो आणि मी इथे माझी कामं टाकून उपटत बसतो... तेव्हा जमणार नाही.. एखाद्या दिवशी येणार नसलास तर आधल्या दिवशी सांगायचं..."या आणि अशा असंख्य अटी व दक्षिणा ठरल्यावर माझा रुद्र सुरु झाला. अण्णांच्या पद्धतीने किमान साडेतीन महिने अपेक्षित असताना तीनच महिन्यात माझा रुद्र शिकून पूर्ण झाला. शिकवण्याची पद्धतही अगदी परंपरागत.. संधीविग्रह करत ऋचा सोडवून मुखोद्गत करायची. सलग सात दिवस म्हटली की वज्रलेप होते असं सतत सांगायचे, त्यामुळे रोज आधी घेतलेल्या संथेचे पठण, मग पुढची ऋचा असं सात दिवस चालायचं. लघुगुरु स्वर, त्यानुसार हाताची आणि मानेची हालचाल करायला अण्णानी शिकवलं. पुढचं अक्षर -हस्व असेल तर मागचं अक्षर दीर्घच म्हणायचं तरच पुढचं -हस्व येतं, शब्दानंतर विसर्ग असेल तर पुढच्या अक्षराचा उच्चार विसर्गाऐवजी करायचा, शब्दाच्या शेवटी अनुस्वार असेल तर त्याचा उच्चार पुढील अक्षरानुसार बदलतो हे पहिल्याच ऋचेत शिकवल्यामुळे मला पुढे कठीण गेलं नाही. 

हरि:ओम् इडादेवहूर्मनुर्यज्ञनीर पासून सुरु झालेली रुद्राभ्यासाची माझी गाडी दरमजल करीत भौवनश्चभुवनश्चाधिपतिश्च ला जाऊन पोचली. पुढे पुरुषसूक्त, श्रीसूक्तही शिकवून झालं. कधीतरी कोणीतरी म्हटलेलं माझ्या लक्षात होतं की सौरसूक्त शिकायला खूपच कठीण. अण्णांचा मूड बघून हळूच विचारलं.."शिकवाल का?".."छट, आजवर दहाबारा जण अर्धवट टाकून गेले. एकच शिकला. आता बास" पण मीही चिकाटीने आग्रह करत राहीलो. अखेरीस पूर्वीच्याच अटींवर सौर शिकणं सुरु झालं. खाडा न करता जात राहिलो आणि सौर पूर्ण केल्याचा आनंद माझ्यापेक्षा अण्णांंना जास्त झाला. शेवटच्या दिवशी उठताना नमस्कार करुन बाहेर निघालो तर हाक मारुन परत बोलावलं, उशीखालचे पैसे हातात कोंबून म्हणाले "हे तू दिलेले पैसे. मला मिळतं ते पुरतं, पण विद्यादानम् अशिष्याय न देयम् म्हणून तुझ्या चिकाटीची परिक्षा पाहिली." पुन्हा एकदा वाकून नमस्कार केला आणि बाहेर पडलो. 

रुद्र शिकवण्याच्या निमित्ताने त्या घरात रुद्राची इतकी आवर्तनं झाली होती की घरातल्या आणि बि-हाडातल्या माणसांना वेगळं शिकवावंच लागलं नसेल. एकदा असंच अण्णा काकूवर भडकले होते, शब्दानं शब्द वाढला आणि "रुद्रातलं काय कळतं तुम्हाला” असं म्हटल्याबरोब्बर काकूनं खणखणीत आवाजात एक दोन नमक दणकवले आणि त्यांच्या पुढ्यातला ग्लास उचलून निघून गेली. अण्णांची रोज  रुद्र शिकवताना इतरही काही आचमनं चालायची, पण कधी स्वर किंवा शब्द चुकला नाही. सगळी वैदिक सूक्त मुखोद्गत असल्याने पोथीत बघूनही कधी शिकवावं लागलं नाही.


एकदा अण्णाना मी विचारलं, की "तुम्ही भिक्षुकी, किंवा गेलाबाजार गावकीच्या महारुद्राला का जात नाही?" अण्णा म्हणाले, "भिक्षुकाने भिक्षुकीचे नियम पाळले पाहिजेत. यजमान माझ्या रुपात परमेश्वराला पाहतो, मला नमस्कार करतो आणि इकडे मी सामिष खाणार, संध्याकाळची आचमनं करणार.. पाप आहे रे हे.. मला नाही रुचणार ते. राहीला भाग महारुद्राचा..... आपण कोणासाठी म्हणतो सांग? ज्यांंच्यासाठी म्हणतो त्याला ऐकू जायला नको?.... उगाच आपली शर्यत लावल्यासारखं गुडगुड करत एक दीड मिनिटात नमक संपवायचा मला पटत नाही. मी रुद्र माझ्यासाठी म्हणतो तर तो एकेक स्वर सुस्पष्ट आलाच पाहिजे." दक्षिणा मिळते म्हणून अण्णानी कधीच याबाबतीत तडजोड केली नाही याचं हे उत्तम उदाहरण होतं.

वय वाढत चाललं तरी अण्णा लोखंडी कांबीसारखे खणखणीत होते. रात्री देवळाच्या बाकांवर मुलं बसायची तिथे गप्पा मारायला यायचे. गतजीवनातले चिटवळ किस्से सांगून हसवायचे. एकदा तर रात्री आमच्याबरोबर काँफी प्यायला स्टँडवर पण आले होते. सर्व वयोगटातील लहानमोठ्यांबरोबर रमायचे. त्यामुळे आम्हाला पण कधी शेजारी अण्णा आहेत म्हणून जीभ चावण्याचे किंवा जिभेला लगाम घालण्याचे प्रसंग कधी आले नाहीत. उलट आपली स्वत:ची भर घालायचे. नाटक, किर्तन, गाणं आणि गाईगुरं या सगळ्याचीच आवड होती त्यांना.

राहत्या घराचा परिसर मोठा असल्याने तिथे अपार्टमेंट बांधायची ठरलं. जोशीआळीतली पहिली अपार्टमेंट या कल्पनेचं मोरपीस अण्णांच्या मनावर फिरत होतं. मोजणी, आराखडा, परवानग्यांंसाठी वेळ लागणारच होता. घराच्या मागच्या बाजूस मोठं आवार होतं, त्या बाजूने बांधकामाला सुरुवातही झाली. असेच एकदा मुलांसोबत स्टँडवर काँफी पिऊन आले आणि घरी झोपायला गेले ते रात्री झोपेतच काँटवरुन कोसळले. ब्रेन हँमरेजचं निदान झालं.  हाँस्पिटलमधे दाखल करुन तब्बल वीस दिवस उलटले, पण अण्णा त्यातून उठले नाहीत. 21 एप्रिल 1997 ला अण्णा जीवनाचं महायुद्ध हरले. अपार्टमेंट पूर्ण होण्यापूर्वीच राहत्या घरी अचेतन रुपात विसावलेले अण्णा आजही नजरेसमोर येतात. अनेक किस्से, आठवणी नजरेसमोर साकार होतात. 

पुलंचा अंतु बर्वा खूपदा आम्ही घनुअण्णांच्याच रुपात पाहीला. आजही रुद्र म्हणताना समोर अण्णा आहेत असा भास होतो आणि हमखास उभाभ्याम् ला अडखळायला होतं. गर्भाश्चमे वत्साश्चमेच्या वेळच्या नेत्रपल्लव्या आठवतात आणि कानात शब्द कडाडतात... Xतमारिच्यांनो काय चाललंय

अण्णा जाऊन आजच 23 वर्षे झाली.... दूरवरुन कोणीतरी रुद्राचं आवर्तनं म्हणताना कानावर येतं, अण्णांची आठवण येते, न राहवून मीही पुढची ऋचा पुटपूटू लागतो. अचानकपणे अण्णांचा आवाज कानात  घुमू लागतो.. "असं मुळमुळीत वाजश्च प्रसवश्चा काय म्हणतो... खणखणीतपणे म्हण... तो पुढचा प कसा जोडाक्षराप्रमाणे आला पाहिजे, त्यासाठी ते अक्षर तिथे तोडायचं.. वाजश्चप् प्रसवश्चा पिजश्चक् क्रतुश्च सुवश्चमूर्धाचव् व्यश्नियश्चांत्यायनश्चांत्यश्च... असं चाबकाच्या फटका-याप्रमाणे खटके आले पाहिजेत"... आज अण्णा या जगात  नाहीत,  परंतु सूक्त कोणतंही असो, अण्णांची आठवण अविभाज्यच....


॥ ओम् तत्सद् ॥


मनोज भाटवडेकर
9421253153

Friday, April 3, 2020

पागेवरची रामनवमी

पागेवरची रामनवमी
आमची पाग, तिथले उत्सव, परंपरा यावर लिहाल तेवढं थोडं आहे.. नवीन वर्ष सुरु झाल्यावर चैत्रातलं हळदीकुंकू आणि रामनवमीची पालखी यांनी सणांना, उत्सवांना सुरुवात व्हायची. पण आज कोरोनामुळे आमची शतकांची परंपरा खंडीत झाली. आज रामाची पालखी निघणार नाही.. मन किमान चाळीस वर्षे मागे गेलं. पूर्वापार दुपारी दत्ताच्या देवळात रामजन्माचं किर्तन व्हायचं. खरंतर कृष्णेश्वराला लागून रामाचं मंदीर पण अगदीच छोटेखानी असल्याने तिथला उत्सव दत्ताच्या देवळात साजरा व्हायचा. तशी आमच्याकडे गंमतच आहे.. शिवरात्रीचा उत्सव कृष्णेश्वराच्या मंदीरात असला तरी छबिन्याची पालखी प्रथम गणपती मंदीरात जाणार. गोपाळकाल्याचा उत्सव साजरा होतो कृष्णेश्वर प्रांगणात पण किर्तन विठ्ठल मंदिरात तर रामनवमीचं किर्तन दत्ताच्या देवळात.
या रामाच्या पालखीच्या कैक आठवणी आहेत. माध्यान्ही रामजन्माचं किर्तन झालं की साधारण एकच्या दरम्यान पालखी निघायची. लैनवाडीतल्या शिवरामाला सांगावा गेलेला असायचाच. मळ्यावरच्या नदीत स्वच्छ आंघोळ घालून सजवलेले पांढरेशुभ्र बैल बैलगाडीला जुंपलेले, तिला झावळ्यांची कमान लावून शिवरामा हजर व्हायचा. मग नगारा गाडीत ठेवण्यासाठी व उरलेली जागा पटकावण्यासाठी मुलांची घाईगडबड असायची. पुढे बैलगाडीची अशी व्यवस्था झाली की मग दुटांगी धोतर वर कोट, डोक्यावर पगडी, गळ्यात ढोलकं घालून विनायकदादा भागवत उभे असायचे. 
सोबतीला बजाअप्पा चितळे, मोरुभाऊ जोशी, भार्गव अण्णा काळे, गोपाळकाका जोशी, बंडूकाका करमरकर, पंढरीकाका बर्वे मंडळी निघत. मागून समस्त ग्रामस्थ मंडळी झांजा, टाळ्या वाजवत. आणि प्रथेप्रमाणे पहिलं गणपतीचं भजन, नंतर रामाची भजनं म्हणत पालखी घरं घेत पुढे सरके. जिथे घरं जास्त तिथे पालखी रेंगाळे आणि मग भजन सांगणारे, म्हणणारे अगदी टीपेला पोचत. घटका गेली पळे गेली तास वाजे घणाणा.. आयुष्याचा नाश होतो राम का रे म्हणा ना म्हणत पुढल्या खटक्यावर घटका शब्द आलाच पाहिजे.. भजन सांगणारे पण अनेक हौशी होते. भजनांची वर्षभराची उजळणी व्हायची. एकामागोमाग एक घरं घेत पालखी लैनवाडीत शिरे. दारात येणाऱ्या देवाच्या स्वागताला रस्ता सारवून वर सु़ंदर रांगोळी असायची. चैत्रात चाफा छान फुललेला असायचा, त्यामुळे रामाच्या गळ्यात चाफ्याच्या फुलांचा घमघमाट असे. झेंडूच्या माळा हा अलिकडचा प्रकार..    पालखी आँक्ट्राँय नाक्यावर पोचली की पलिकडची गोपाळकृष्ण वाडीतली मंडळी आरतीचं ताट घेऊन पुढे यायची आणि मग त्या
चौकात चार भजनं जास्त व्हायची. शिवरामा पण बैलांना पाणी पाजून घ्यायचा.
आमचं घर बांधताना सुताराच्या मागे लागून आम्ही एक छोटीशी पालखी करुन घेतली होती. मुख्य पालखीच्या मागोमाग आमची छोटी पालखी असायची. तिलाही ओवाळणी व्हायची. काय भारी वाटायचं सांगू.. आणखीही एकदोन जणांच्या छोट्या पालख्या असायच्या पण पालखीत लाईट असणारी आमचीच पालखी. 
आरत्या उरकल्या, गूळपाणी झालं की पालखी किंजळकरांच्या घरावरुन आरत्या घेत मार्गस्थ व्हायची. सुतारमारुतीजवळ सांधा बदलून एक मारुतीचं भजन दणक्यात व्हायचं. तोपर्यंत आम्ही गोपूचं दुकान यायची वाट बघतच असायचो. आमच्या छोट्या पालखीतला एखादा रुपया घेऊन भोईमंडळींची तहान भागवली जायची. जुन्या नाक्यावर चितळे मंडळींच्या घराजवळ दामूअण्णा, वसंतदादा हमखास खाऊ द्यायचे. तापल्या रस्त्यावरुन ही सगळी मिरवणूक जायची पण शिरस्त्याप्रमाणे प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी असल्याशिवाय हजेरी लावता येत नसल्यामुळे उन्हाचा तडाखा टोपी सोसायची. पाँवरहाऊसच्या चौकात थांबून नवं भजन व्हायचं, जाणारे येणारे दर्शन घ्यायचे. 
पुढे उघड्या मारुतीवर पालखी पोचायची. पुन्हा एक मारुतीचं भजन आणि मग प-ह्यावरुन पालखी गोडशांची घरं घेऊन पुन्हा जोशी आळीत शिरायची. संपूर्ण गांवफेरी व्हायची आणि शेवटचं भजन रामाच्या देवळासमोर व्हायचं. पुढे पालखी दत्ताच्या देवळात विसावायची, रुपं सोडली जायची, जमा रक्कम, नारळ यांची गणती व्हायची. नारळांचा लिलाव होण्याआधी मानक-यांना नारळ दिला जायचा. लहान पालखीवाल्यांचा पण मान केला जायचा. गावातील कोणीतरी दुकानदार किंवा घरी कार्य योजलेला ग्रामस्थ नारळाचा लिलाव घ्यायचा. आम्हाला नारळ मिळाला की पालखी उचलून आम्ही सटकायचो. कारण त्यानंतर पुरुषानाना भागवतांकडे कैरीचं पन्हं असायचं. देणा-याच्या लक्षात न येता कोण किती भांडी पन्हं पितो याची सुप्त स्पर्धा असायची. घरी गेल्यावर जमलेल्या पैशाची वाटणी व्हायची, आमची रामनवमी इथेच संपायची. पण गावकीत दुसऱ्या दिवशी हरिजागर असायचा.
एके वर्षी विनायकदादांना उनं लागलं, ते चक्कर येऊन पडले आणि मग पुढच्या वर्षी एक ऐवजी साडेतीन वाजता पालखी निघू लागली, ती घरं वाढल्याने दिवस मावळता परत यायला लागली. काही वयस्कर मंडळी निजधामास गेली, त्यांची जागा बाकीच्यांनी घेतली. भजन सांगण्यात सदानंद जोशी, कल्याण भागवत पुढे आले. ढोलकीला सुधाकर, गिरी, शेखर ही मंडळी दिसू लागली. पण तरीही नोकरी उद्योगामुळे उपस्थिती रोडावू लागली. सुधीरकाकांनी घरचा वसा पुढे सुरु ठेवलाच होता. वामन, गिरी, मनीष यांच्या मदतीनं संध्याकाळी समारत्न सुरु झालं. कालौघात बैलगाडीसह शिवरामा गडप झाला आणि तिथे टाटामोबाईल आली, स्पीकरवर मकरंदबुवा रामदासींच्या आवाजात रामधून आली पण हौद्यात नगारा अजूनही टिकून आहे. शतकी परंपरा सांभाळत काही बदल स्विकारत आजवर रामनवमीची पालखी सुरु होती. ज्या भागवतांनी हे मंदीर ग्रामस्थांच्या हवाली केलं, त्यांच्या मृत्युपत्रानुसार हा उत्सव एक दिवसाचा न उरता तो प्रतिपदेपासून साजरा होऊ लागला. याच भागवतांच्या वंशजांनी म्हणजे माधव आणि मुकुंद भागवत यांनी राममंदिराचा जीर्णोद्धार स्वखर्चाने करुन देण्याची मनिषा व्यक्त करुन दीडदोन महिनेही उलटले नाहीयेत. पुढल्या उत्सवावेळी सभामंडपासह पूर्वाभिमुख मंदीरात उत्सव संपन्न होईल. जुन्या मंदिराची पालखी यावेळची अखेरची अशी आमची धारणा कोरोना संकटाने हाणून पाडली आणि आमच्या शतकी परंपरेत एक खंड पडला.

असो, रामेच्छा बलियसी।
आज घरात बसून रामनाम जप करणे हिच पालखी समजू आणि पुढील वर्षी दुप्पट उत्साहाने उत्सव साजरा करु.

मनाचीं शतें ऐकता दोष जाती।
मतीमंद ते साधनायोग्य होती।।
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्ये आंगी।
म्हणे दास विश्वासतां मुक्ति भोगी।।

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

मनोज भाटवडेकर
02.04.2020

वि.सू. फोटो २०१८च्या रामनवमीचे आहेत.

Tuesday, March 10, 2020

आमची लडाखवारी - भाग २


समुद्रसपाटीपासून सुमारे ११००० फूट उंचीवर लेह शहर सभोवताली उंच पहाड आणि मधे बशीच्या आकारात वसलेले आहे. लेहमधील प्रसिद्ध ठिकाणांबाबत माहिती घेण्यापूर्वी लडाखच्या इतिहासात थोडसं डोकवावे लागेल.  लडाखी राजवंश नामग्याल या घराण्याने 15 व्या शतकाच्या मध्यापासून अगदी 1842 च्या डोग्रा राजांच्या अंतिम आक्रमणापर्यंत लडाखवर राज्य केलं. या कालखंडात अनेक नामवंत नामग्याल राजे होऊन गेले, पैकी तशी नामग्याल हा विशेष दखल घेण्याजोगा. मुस्लिम आक्रमकांची नामग्याल साम्राज्यावरची आक्रमणं परतवून बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन व जतन तर केलेच पण नवनव्या बौद्धमठांची उभारणी (monestaries) त्याने केली.  सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात Tsemo fort मूळचा राजमहाल राँयल पँलेस याची उभारणी पण त्याने केली.  त्याच्या नंतर गादीवर आलेला सेंगे नामग्याल याची कारकिर्द आणखी दैदिप्यमान राहीली. अनेक कल्याणकारी योजना, महत्वाकांक्षी बांधकामे त्याने केली. त्याने केवळ तीन वर्षांत नऊ मजली लेह राजवाडा बांधला अशी माहिती उपलब्ध आहे. ल्हासा येथील प्रसिद्ध पोताला राजवाड्याशी साधर्म्य असणारा हा राजवाडा सध्या पुनर्रचनेसाठी बंद आहे. 
सेंगे नामग्याल ने लेहचं सिल्करुटवरील महत्त्व ओळखलं आणि आपली राजधानी शे वरुन हलवली आणि ती लेहला आणली. सेंगेच्या कारकिर्दीत लेहचं व्यापारी महत्त्व वाढतंच गेलं ते अगदी 1834 मधे डोग्रा राजांनी आक्रमण करेपर्यंत. 1834 ते 1842 तत्कालीन नामग्याल राजाने डोग्रांना झुंजवलं पण अखेर डोग्रांनी नामग्याल राजांना हरवलं. राजा पकडला गेला आणि त्याला स्तोक येथे बंदीवासात ठेवलं गेलं. डोग्रा आक्रमणात कमालीचा उध्वस्त झालेल्या लेह राजवाड्याची दुरुस्ती अलिकडच्या काळात हाती घेण्यात आली.
लेहमधील दुसरी ठळक वास्तू म्हणजे जामा मस्जिद 1685 मधे बांधली गेली. नामग्याल घराण्यातला एक शासक डेलेग नामग्याल याने तिबेट प्रांतामधे लुडबूड सुरु केली. तिबेटी सैन्याने जोरदार प्रतिकार करताना  डेलेगच्या बलस्थानाला म्हणजे बासगोला वेढा घातला. पराभवाच्या भितीने डेलेगने मोंगलांना साकडं घातलं. त्यांनी डेलेगची सुखरुप सुटका केली पण त्याची किंमत डेलेगला मुस्लिम धर्म स्विकारुन चुकवावी लागली आणि अशा रितीने मध्य आशिया आणि भारत यांना एकमेकांपासून विलग करणाऱ्या हिमालय आणि काराकोरम पर्वतराजींच्या मधे वसलेल्या लेहचे व्यापारी महत्त्व उत्तरोत्तर वाढतच गेले.  यारकंद व खोतन या व्यापारी केंद्रातून भारताकडे चालणाऱ्या व्यापाराला लेह हे विश्रांतीस्थान म्हणून मिळाले. एकावेळी दहा दहा हजार घोडे सोबत घेऊन व्यापारी काफिला चालायचा, यावरुन या मार्गावरील संपन्नता लक्षात येईल. 1949 पर्यंत हा आलेख उंचावतच राहीला परंतु पाकीस्तानने काश्मीर मधे घुसखोरी केल्यानंतर हा व्यापार कायमचा थंडावला तो आजवर. या दरम्यान यारकंदचे हजारो मुस्लिम लेहमधे अडकले ते शेवटी लेहजवळच्या चुशोतजवळ वसले. त्यामुळे लेहमधे बौद्ध धर्मियांच्या सोबत मुस्लिमांची पण संख्या नजरेत भरते. यासोबतच आणखी एक व्यापारी मार्ग त्याकाळी अस्तित्वात होता तो म्हणजे तिबेट ते श्रीनगर.  तिबेटहून उच्च दर्जाची पश्मिना लोकर लडाखच्या पूर्व भागातून लेहमार्गे कश्मीरला पाठवली जायची. कश्मीरमधले कुशल विणकर या लोकरीपासून शाल, स्वेटर तयार करायचे.
ला डाख म्हणजे खिंडींचा प्रदेश पुढे अपभ्रंशित होत लडाख, लद्दाख म्हणून ओळखला जातो. याचा सहसा उच्चार लेहलडाख असा करतात पण तांत्रिकदृष्ट्या हे चूक आहे. जम्मू कश्मीर राज्याचा सर्वात उत्तरेकडचा विभाग लडाख, ज्याचे मुख्यालय लेह हे आहे. जम्मू, कश्मीर आणि लडाख अशा तीन विभागात विभागलेले हे भारताचे मुकुटमणी राज्य. लडाखची पूर्व बाजू चीनने बळकावली तर पश्चिम बाजू पाकीस्तानने. परंतु सामरिकदृष्ट्या महत्वाच्या सियाचीन हिमनदीवरील आपल्या कब्जामुळे या दोन्ही देशांवर आपला धाक आहे. नुकत्याच घडलेल्या कलम 370 रद्द करण्याच्या कृतीमुळे लडाख आता केंद्रशासित प्रदेश झाला असून जम्मू कश्मिरपासून त्याची सुटका झाली आहे. केंद्रशासित प्रदेश झाल्या झाल्या भेट देणारे कोकणातील बहुधा पहिले आम्हीच असावेत.
लडाखमधे 77% जनता बौद्धधर्मिय तर 14% मुस्लिम, 8% हिंदू आणि 1% इतर आहेत. इथे बहुतांश जण भोटी अथवा बोधी ही लडाखी भाषा जी मूळची तिबेटी भाषा बोलतात, मात्र पर्यटनामुळे हिंदी आणि इंग्रजी देखील उत्तम बोलली जाते.  Julley म्हणजे नमस्ते म्हणत आपलं स्वागत होतं पण आजकाल julley हा शब्द निरोप घेताना पण वापरला जातो. सिंधू नदी ही लडाखमधून वाहणारी प्रमुख नदी.. जी तिबेटमधील मानसरोवर जवळ उगम पावून चीन, भारत आणि पाकिस्तान मधून सुमारे 3180 किमीचा प्रवास करत समुद्रास मिळते. 
झंस्कारमधे उगम पावणारी सुरु नदी कारगिलजवळ द्रास नदीला मिळते.
नदीचं मूळ शोधू नये म्हणतात पण झंस्कार नदीचं मूळ खूपच रोचक आहे.. झंस्कार नदीला दोन फाटे आहेत. पेन्सी खिंडीतून उगम पावणारी दोडा नदी हा एक फाटा तर दुसऱ्या बाजूला शिंगू खिंडीत उगम पावणारी करग्याग नदी व बारालाच्छा खिंडीत उगम पावणारी त्सरप नदी यांच्या संगमातून निर्माण झालेली लुंगनाक नदी. अशी ही झंस्कार नदी हिवाळ्यातील चदर ट्रेकसाठी प्रसिद्ध आहे. मरखा खो-यातून वाहणारी मरखा नदी आपला जलसाठा झंस्कार नदीला अर्पण करते. पुढे ही झंस्कार नदी निमूजवळ सिंधू नदीला मिळते. नुब्रा खो-यातून वाहणारी नुब्रा नदी सियाचेन हिमनदीतून उगम पावते व उत्तर लडाखमधून वाहते. पुढे श्योक नदीशी तिचा संगम होतो आणि दोन्ही नद्यांचा प्रवाह पाकीस्तानमधे स्कर्डूजवळ सिंधू नदीला मिळतो. थोडक्यात लडाखच्या विविध भूप्रदेशात उगम पावलेल्या अनेक नद्या शेवटी सिंधू नदीला मिळतात आणि पुढे पाकीस्तानचा प्रदेश समृद्ध करतात.

मनोज
०६.०८.२०१९

आमची लडाखवारी - भाग १




"ए मनोजकाका, आपण जाऊया ना लडाखला... तू काढ ट्रीप "..   मयुरी, माझ्या पुतणीने अगदी पिच्छा पुरवला होता. "चालेल.. खरंच जाऊया"... असं म्हणायची माझी ही तिसरी वेळ. पण यावेळी मात्र मी खरोखर मनावर घेतलं. श्रीनगर आणि लेह या दोन्ही ठिकाणी माझे टूर आँपरेटर मित्र आहेत. दोघांकडून खर्चाचा अंदाज घेतला पण विचार केला की लडाख करायचं तर आँपरेटर श्रीनगरचा इतक्या लांबचा कशाला? शेवटी तो आपल्याला लेह आँपरेटरच्याच हवाली करणार. लेहला रशीद माझा मित्र टूर आँपरेटर पण सध्या तो माऊंटेनिअरिंगमधे घुसल्याने त्याचा भाऊ जुमाकडून डिटेल्ड प्लँन केला पण का कोण जाणे काहीतरी खुपत होतं. अचानकपणे माझा जुना स्नेहसंबंध आठवला, नितीनला फोन केला. त्याने खूपच उत्साह दाखवला.  इतर टूर आँपरेटर जे करत नाहीत ते आपण करु हाच दोघांमधला समान धागा ठरला.. प्रवासाची आखणी जशी ठरली तशी मेंबर संख्या पण वाढत चालली. 
५ आँगस्टच्या रात्री ९ जण मुंबईहून तर ५ जण पुण्याहून विमानाने श्रीनगर पुढे गाडीने कारगिल, लेह, खारदुंग, नुब्रा व्हँलीतील तुरतूक हे सीमावर्ती ठिकाण, परत येऊन श्योक व्हँलीतून पँगाँग, परतीच्या प्रवासात चांगला पासमधून कारु, आणि लेह असा प्रवास ठरला. अर्थात लडाख म्हटलं की कागदावरचा प्रवास हा फक्त कागदावर राहतो.  सतत अपग्रेडेशन ठेवायची तयारी नसेल तर हाल होतात याचे प्रत्यंतर आम्हाला पण चुकले नाही. 02 आँगस्ट 2019 ला अचानकपणे एक अधिसूचना प्रसिद्ध झाली, ज्यात पर्यटकांनी काश्मीर खोरं तातडीने सोडावं असा स्पष्ट उल्लेख होता...
कारणांबाबत गोंधळ असल्याने काहीच भाष्य करता येत नव्हतं... Wait and watch एवढंच हाती होतं पण प्रवासाची तारीख अगदी जवळची असल्याने मनावर अनिश्चिततेचं सावट होतं. संपूर्ण दिवस असाच गेला. तीन तारखेला मी प्रवासात होतो. कश्मीरमधे काय घडतंय आणि घडणार आहे याची एव्हाना कल्पना आली होती. काश्मीर पूर्णपणे वगळून प्रवास करायचा हाच एकमेव मार्ग उरल्याने दिल्ली ते श्रीनगर या प्रवासाऐवजी दिल्ली लेह असा प्रवास ठरवला. पण् म्हटलं ना, लडाखचे प्रवास कागदावर सोपे  वाटतात... तीन तारखेपासून पावसाने सर्वत्र थैमान सुरु केले. महत्वाच्या मिटींगसाठी मी कोल्हापूरला होतो, परतीच्या प्रवासात रस्त्यामधे तीन ठिकाणी पडलेल्या झाडांमधून मार्ग काढत रात्री उशिरा चिपळूण गाठलं...
  

  
चार तारखेची सकाळ उजाडली तीच रात्रभर न थांबलेल्या पावसाने मुंबई रस्ते बंद झाल्याची बातमी घेऊन. त्यात भर पडली ती दरड कोसळून कोकण रेल्वे बंद झाल्याची.  पावसाने मुंबईची अगदी तुंबई झालेली.  हतबुद्ध व्हावे अशी परिस्थिती निर्माण झालेली. मुंबईला पोचणेच अशक्य वाटू लागले. तसंही दिल्ली लेह तिकीटं काढायचीच होती. सरकारी कृपेने जातानाची तिकीटं चार्जेस न लागता रद्द होणार होती. पटकन निर्णय घेतला आणि मुंबई ऐवजी पुणे लेह अशी तिकीटे काढायची असं ठरवून आँफिस गाठलं... पावसाने मुसळधार रुप सोडून जणू ढगफुटीचा अवतार धारण केला होता. हा हा म्हणता चिपळूणात पाणी भरलं आणि ते माझ्या आँफिसच्या पायरीजवळ आलं... लँपटाँप, प्रिंटर उचलून गाडीत टाकला आणि त्या भरलेल्या पाण्यातून गाडी घराकडे दामटली.



महत्प्रयासाने एकदाची आम्हा नऊजणांची तिकीटं निघाली तर पुण्याच्या पाचजणांची त्याच विमानाची दिल्ली लेह तिकीटं पण काढून झाली. आता मी अगदी आत्मविश्वासाने सगळ्यांना सांगितले की उद्या आपण पुण्याहून थेट लेहला जातोय आणि श्रीनगर वगळता उर्वरित सर्व कार्यक्रम आता ठरल्याप्रमाणे पार पडेल... पण....
५ आँगस्टची सकाळ जास्तच चिंताजनक होती.. कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झाल्याने कराड रोड किमान तीन ठिकाणी पाण्याखाली होता.. ताम्हिणी घाट दरड कोसळल्याने बंद झालेला तर आंबा मार्गे कोकरुड रस्ता मलकापूर जवळ पाण्याखाली होता. वरंधा आणि महाबळेश्वर कडून जायचं तर जगबुडी पूल केव्हाही बंद होण्याची शक्यता... अर्थात रेल्वेरस्त्याने जाऊन खेड मधून बाहेर पडण्याचा आँप्शन असल्याने त्याचं एवढं संकट वाटत नव्हतं.. आमच्या खेडच्या मंडळींना तिकडेच थांबवून आम्ही चिपळूण सोडलं.. जगबुडी ओलांडली आणि हुश्श झालं.. खेडवाले स्थानापन्न झाले आणि कशेडीदरम्यान वरंधा बंद झाल्याचे कळले. एकमेव तारणहार आंबेनळी घाट धुवाँधार पावसातून पार केला. एरवी एन्जॉय करावं असं दाट धुकं, पण आज तिकडे लक्षही नव्हतं.. कधी एकदा NH4 ला लागतोय असं झालं होतं.
वेण्णा लेकजवळ ओसंडून वाहणारं पाणी रस्ता ओलांडून शेताडीत पसरत होतं पण आमच्या गाडीला अडवू नाही शकलं... पाचगणी ओलांडून पसरणी घाटाला लागलो तेव्हा छान उन्हं पसरली होती... वाई मागे टाकत NH4 ला लागलो आणि आम्ही सुssटssलो....
वाई फाट्यावर पोटपूजा केल्यावर आस्ते कदम पुण्याकडे निघालो.. साधारणपणे साडेपाचला पुण्यात पोचल्यावर विमानाच्या वेळेपर्यंत करायचं काय हा प्रश्न माझ्या मोठ्या बहिणीने पद्माताईने परस्परच सोडवून टाकला.. चहा, विश्रांती, पुन्हा चहा, गप्पा आणि मग जेवण करुन एअरपोर्ट असं शेड्यूल तिनंच फायनल करुन टाकलं.. तिच्याकडे पोचल्यावर आजवरचा ताण एकदम कमी झाल्याने गात्रं सैलावली... थोडीफार डुलकी पण मिळाली.. घरच्यांचा निरोप घेऊन आम्ही एअरपोर्टवर पोचलो... 
जसजशी वेळ जवळ येत गेली तसतसे एकेक मोहरे जमा होत गेले.. पुणेकरांचे विमान आमच्या पाठोपाठच सुटणार होते पण आयत्यावेळी ते तासभर लेट असल्याची घोषणा झाली.. आमच्यावरचं किटाळ तिकडे सरकलं होतं बहुधा... अर्थात पुढील विमानाच्या वेळेमधे पाच तासांचं अंतर असल्यामुळे या उशिराची काळजी नव्हती... 
यथावकाश आमचं विमान सुटलं... प्रत्येकाने झोपेची थकबाकी वसूल करायला सुरुवात केली पण अतिश्रमाने देखील झोप येत नाही... दिल्ली येईपर्यंत मी जागाच होतो.. टाईमपास म्हणून खिडकीच्या काचेला नाक लावून खाली काही दिसतंय का या निष्फळ प्रयत्नात वेळ जात राहीला...
पहाटे पोटात खड्डा पाडण्याचा कार्यक्रम पार पाडत विमान जमिनीला टेकलं.. आमच्या नऊजणांपैकी सहा जणांचं लगेज थेट लेहला मिळणार होतं पण बाकी तीन जणांना सामान कलेक्ट करुन पुन्हा चेक इनचा सव्यापसव्य पार पाडायला लागणार होता... पुणेकर दुसऱ्या टर्मिनलवरुन इकडे येणार होते म्हणून आम्ही त्यांची वाट पाहत उभे राहीलो..
एअरपोर्टवरच्या चहाचे दर पाहून कोणाच्याच घशाला त्याची कोरड पडेना पण शेवटी वन बाय टू करत नरडं जरा शेकलं. सुदेशने मात्र एका स्टाफमेंबरला हरभ-याच्या झाडावर चढवून त्यांच्या कँटीनमधला चहा स्वस्तात पदरात पाडून घेतला. बघताबघता एअरपोर्टवर गर्दी वाढली तशी आम्ही निमूटपणे चेक इनचे सोपस्कार पार पाडून विमानात बसलो.. सुरुवातीला ढगातून आणि मग पावसाच्या थेंबातून मार्ग काढत विमान चाललं... काही वेळाने मात्र हवा एकदमच स्वच्छ झाली आणि पायाखाली बर्फाच्छादित पर्वतशिखरं दिसू लागली.. ते विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी प्रत्येकालाच खिडकी हवी होती... विमान ब-यापैकी रिकामं असल्याने सर्वांची तीही इच्छा पूर्ण झाली.. खाली मनाली लेह हायवे दिसू लागला आणि लेह जवळ आल्याचे कळले.. वाळवंटी प्रदेशातील हिरवळीचे पुंजके आणि त्याआधारे वसलेल्या वस्तीच्या खुणा मागे टाकत विमानाने लेह शहरावर घिरट्या घातल्या आणि कोणाला कळायच्या आत स्पितुक मोनेस्ट्रीच्या बाजूने विमानाने धावपट्टीवर सूर मारला..
सर्वाधिक उंचीवरील धावपट्टी असा लौकिक असणारी आणि लष्करी वापराची व मालकीची ही धावपट्टी लांबीला तुलनेत लहान आहे..  एअरपोर्ट इमारत पण तशीच छोटीशी आहे.. बाकी सोपस्कार पार पाडून बाहेर आलो तर दोरजी मला पाहून जुले सर करत पुढे आला.. जुले म्हणजे लडाखी भाषेत नमस्ते... टपावर बँगा चढवून गाडी हलली... हाँटेल खारदुंग ला च्या दारात आमच्या स्वागतासाठी एक सरप्राईज उभं होतं... घरापासून चार हजार किमीवर एक मराठी माणूस आमच्या स्वागतासाठी उभा होता. आपटेकाकांनी सर्वांचे स्वागत करुन चहा देतानाच काही महत्त्वाच्या सूचना व समुद्र सपाटीपासून ११००० फुटांवर घ्यायची काळजी याची माहिती दिली... 
आजचा दिवस हा फक्त लोळून काढायचा असल्याने जेवण झाल्यावर मंडळी जी विसावली ती एकदम संध्याकाळीच उठली.. इतक्या उंचीवर आँक्सिजन कमतरतेमुळे पुरेशी विश्रांती आणि भरपूर पाणी आवश्यक असते.. माऊंटन सिकनेस टाळायचा असेल तर या गोष्टी मस्ट... संध्याकाळचा चहा पिताना टिव्हीवर काश्मीरमधील धामधूम पाहत होतो तर लडाखमधला आनंद अनुभवत होतो... जरावेळाने पाय मोकळे करायला बाहेर एक फेरफटका मारुन परतलो..
उद्याचा दिवस स्थानिक टुरिस्ट स्पाँटचा होता.. थोडं उशिरा निघायचं असल्याने रात्री आमची अंताक्षरी चांगलीच रंगली... जशी थंडी वाढली तशी मात्र बैठक आवरती घेऊन सगळेजण झोपेच्या कुशीत शिरले...

मनोज

०६.०८.२०१९

(क्रमशः)